यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:25 IST2025-06-09T06:25:06+5:302025-06-09T06:25:41+5:30
Encounters In Delhi: दिल्लीमध्ये पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये नाट्यमय वाढ दिसून येत आहे. गुन्हेगारांना लक्ष्य करणाऱ्या अनेक कारवाया वेगाने होत आहेत. यामुळे दिल्ली पोलिस उत्तर प्रदेशच्या आक्रमक मॉडेलचा अवलंब करीत आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये नाट्यमय वाढ दिसून येत आहे. गुन्हेगारांना लक्ष्य करणाऱ्या अनेक कारवाया वेगाने होत आहेत. यामुळे दिल्ली पोलिस उत्तर प्रदेशच्या आक्रमक मॉडेलचा अवलंब करीत आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दिल्ली पोलिसांनी यावर्षी एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले होते की, राजधानीत ९५ संघटित गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत. जून २०२५ च्या पहिल्या पाच दिवसांत दिल्ली पोलिसांनी पाच हाय-प्रोफाइल एन्काउंटर केले आहेत. २ जूनला जैतपूरमध्ये हेड कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्या आसिफला चकमकीनंतर अटक करण्यात आली.
कालिंदी कुंजमध्ये झालेल्या एका अन्य एन्काउंटरमध्ये मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचा आरोप असलेल्या राजपालला चकमकीनंतर अटक करण्यात आली. त्याच दिवशी न्यू उस्मानपूरमध्ये गोळीबारानंतर दरोड्याचा कट रचणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली.
दुसऱ्या एका एन्काउंटरमध्ये कुख्यात भाऊ टोळीशी संबंधित एका शूटरला स्पेशल सेलने अटक केली. या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागली. ५ जूनला शेख सरायजवळ दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हेगारांना गोळीबारानंतर पकडले. या चकमकींची वेळ महत्त्वाची आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही महिन्यांपूर्वी गुन्हेगारी टोळ्यांशी दोन हात करताना कठोर राहण्याचे निर्देश दिले होते.
८ वर्षांत १२,९६४ चकमकी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश पोलिसांच्या झीरो टॉलरन्स धोरणाचा संदर्भ म्हणून या चकमकींकडे बघितले जात आहे. ज्यामध्ये २०१७-२०२४ दरम्यान १२,९६४ चकमकी झाल्या.
यात २०७ जणांचा मृत्यू झाला. चकमकींचा असा एकत्रित डेटा दिल्ली पोलिसांच्या वेबसाइटवर कुठेही उपलब्ध नाही. दिल्ली पोलिसांनी चकमकींदरम्यान मारले नाही, तर पायात गोळ्या घालून गुन्हेगारांना जखमी केले.