तंत्रज्ञानाचे गुलाम बनू नका, ‘एआय’ हा शिक्षणाचा पर्याय नसावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 08:35 IST2026-02-10T08:32:54+5:302026-02-10T08:35:35+5:30
या कार्यक्रमाला कोईम्बतूर, रायपूर, गुवाहाटी आणि गुजरात येथील विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

तंत्रज्ञानाचे गुलाम बनू नका, ‘एआय’ हा शिक्षणाचा पर्याय नसावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला
नवी दिल्ली : तंत्रज्ञानाला आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही मार्गदर्शन आणि मूल्यवृद्धीसाठी वापरावी, शिक्षणाचा पर्याय म्हणून नव्हे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना दिला. ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाच्या नवव्या पर्वातील दुसऱ्या भागात त्यांनी सांगितले की, काही मुलांसाठी मोबाइल फोन हेच जणू सर्वस्व झाले आहे; मोबाइल किंवा टीव्ही पाहिल्याशिवाय त्यांना जेवणही जात नाही.
या कार्यक्रमाला कोईम्बतूर, रायपूर, गुवाहाटी आणि गुजरात येथील विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. मोदी म्हणाले की, प्रत्येक काळात नव्या तंत्रज्ञानाबाबत (उदा. संगणक, मोबाइल फोन आदी.) चिंता व्यक्त होत आली आहे. त्याची भीती बाळगण्याचे कारण नाही. तंत्रज्ञानाचा मी गुलाम बनणार नाही, असा ठाम संकल्प विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. जगात नोकऱ्यांचे स्वरूप नेहमी बदलत राहाणार आहे. तंत्रज्ञान समजून घेणे, स्वतःच्या क्षमतांचा विस्तार करणे आवश्यक आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले...
परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात आणि पुरेशी झोप घ्यावी.
परीक्षेची नीट आणि समजून तयारी केल्यानंतर तुम्हाला कधीही तणाव जाणवणार नाही.
पालकांनी आपल्या मुलांची इतरांशी तुलना करू नये.
अभ्यास आणि आवड हे दोन्हीही
उपयुक्त असून, या गोष्टी एकमेकांना पूरक ठरू शकतात.
‘परीक्षा पे चर्चा’मध्ये विद्यार्थ्यांना सल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भविष्यातील नेतृत्वाकडून निर्भयता हा गुण अपेक्षित आहे. नेतृत्व म्हणजे निवडणुका किंवा भाषणे नव्हे, तर इतरांना समजावून सांगण्याची आणि पटवून देण्याची क्षमता. तंत्रज्ञानातील नवकल्पना असोत किंवा व्यावहारिक उपाययोजना अशा कोणत्याही क्षेत्रात आपल्याला काय कामगिरी करायची आहे, हे आधी मनाशी ठरविले पाहिजे.