भारतीय हवाई दलाने 'ऑपरेशन सिंदूर' बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे अनेक स्तर खंबीरपणे एखाद्या भिंतीसारखे उभे होते. त्याला भेदणं पाकिस्तानला अशक्य होतं. डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल एके भारती यांनी "पाकिस्तानने चीनचं एअर टू एअर मिसाईल PL-15 चा वापर केला होता. पण या मिसाईलने आपलं टार्गेट मिस केलं. फोटोमध्ये तुम्ही या मिसाईलचे तुकडे पाहू शकता. ते आता आमच्याकडे आहेत" असं म्हटलं आहे.
डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही Loiter munitions आणि Unmanned aerial system बद्दल चर्चा केली आहे. आम्ही हे munitions पाडले आहेत. तुम्ही त्याचे फोटो पाहू शकता. एका फोटोचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की ही YIHA सिस्टिम आहे आणि ती तुर्कीमध्ये बनवली आहे. पण आम्ही ते पाडले आहे. "
"ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
एके भारती यांनी भविष्यासाठी पाकिस्तानला इशारा दिला आणि म्हटलं की, "आमचे सर्व लष्करी तळ, आमच्या सर्व यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत आणि भविष्यात गरज पडल्यास कोणत्याही मोहिमेसाठी तयार आहेत. आपल्या नवीन यंत्रणेबद्दल बरच काही सांगितलं आणि लिहिलं गेलं आहे परंतु आपल्या जुन्या यंत्रणांनी देखील अद्भुत काम केलं आहे. आमच्या या यंत्रणांनी पाकिस्तानचे आधुनिक पिढीचे ड्रोन आणि मिसाईल देखील पाडली आहेत. युद्धात आपली ताकद दाखवणाऱ्या आपल्या या यंत्रणांनी पाकिस्तानी हल्ल्याला थेट आव्हान दिलं आणि शत्रूची शस्त्रे नष्ट केली. याशिवाय गरज पडल्यास आमची उपकरणं भविष्यातील कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत."
"दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी "ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करणं आहे. आपण १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला" असल्याचं म्हटलं आहे. तसेच दहशतवाद्यांचे अड्डे उडवून दिल्याचे पुरावे दाखवले. दहशतवादी हल्ल्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये मुदस्सर, हाफिज जमील आणि युसूफ अझहर असे तीन मोठे दहशतवादी मारले गेले आहेत.