हतबल पित्याने न्यायमूर्तींच्या टेबलावर ठेवलं मृत भ्रूण, हायकोर्टात उडाली खळबळ, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:10 IST2026-03-10T17:08:43+5:302026-03-10T17:10:51+5:30
Madhya Pradesh Crime News: एका हतबल पित्याने त्याच्या पत्नीच्या गर्भपातामुळे मृत झालेले अर्भक थेट न्यायमूर्तींच्या आसनासमोरील टेबलावर ठेवून न्यायाची मागणी केल्याने जबलपूर येथील मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये आज खळबळ उडाली. मला न्याय द्या, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी आर्त विनवणी त्याने न्यायमूर्तींजवळ केली.

हतबल पित्याने न्यायमूर्तींच्या टेबलावर ठेवलं मृत भ्रूण, हायकोर्टात उडाली खळबळ, त्यानंतर...
एका हतबल पित्याने त्याच्या पत्नीच्या गर्भपातामुळे मृत झालेले अर्भक थेट न्यायमूर्तींच्या आसनासमोरील टेबलावर ठेवून न्यायाची मागणी केल्याने जबलपूर येथील मध्य प्रदेशउच्च न्यायालयामध्ये आज खळबळ उडाली. मला न्याय द्या, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी आर्त विनवणी त्याने न्यायमूर्तींजवळ केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार दशाशंकर पांडे असं न्यायमूर्तींच्या आसनासमोरील टेबलवर मृत भ्रूण ठेवणाऱ्या पित्याचं नाव आहे. तो रीवा येथील रहिवासी आहे. त्याने सांगितले की, मी काम करत असताना शोरूममध्ये सुमारे २०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती मला मिळाली होती. जेव्हा मी या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला. खरं सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर जीवघेणे हल्ले होण्यास सुरुवात झाली.’
हल्लीच झालेल्या एका हल्ल्यादरम्यान, दयाशंकरच्या पत्नीला मारहाण झाली होती. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. या गर्भपातामुळे मृत झालेलं भ्रूण पुरावा म्हणून तो कोर्टात घेऊन आला होता.
दरम्यान, हा दयाशंकर पांडे राजकारणातसुद्धा सक्रिय राहिला आहे. सन २०२४ मध्ये त्याने लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवली होती. गेल्या दोन वर्षांत आपल्यावर चार वेळा जीवघेणे हल्ले झाले, असा दावा तो करतो. तसेच पोलीस आणि प्रशासनाकडे अनेकदा सुरक्षेसाठी विनवणी केल्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही, त्यामुळे आपण हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे, असे दयाशंकर पांडे याने सांगितले.
या घटनेनंतर उच्च न्यायालयामधील सुरक्षा रक्षक आणि पोलीस सक्रिय झाले. तसेच दयाशंकर पांडे आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तसेच तिथे त्यांची समजूत घालण्यात आली. दरम्यान, हायकोर्टात मृत भ्रूण नेण्याचा प्रकार घडल्याने याकडे सुरक्षा व्यवस्थेतील चूक म्हणूनही पाहिलं जात आहे.