नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दिल्लीतील चंदबाग पुलाजवळ वाहणार्या नाल्यातून गुप्तचर विभागाच्या (आयबी) अधिकाऱ्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. अधिकारी अंकित शर्मा खजुरी येथे राहत होते. दंगोखोऱ्यांनी मारहाण करून मृतदेह नाल्यात फेकल्याचा आरोप केला जात आहे.
'दुसऱ्यांना वाचवण्याच्या नादात माझ्या मुलाने जीव गमावला' अशी प्रतिक्रिया अंकित यांच्या आईने दिली आहे. 'अंकित कामावरून घरी आले होते. त्याच दरम्यान गोळाबाराचा आवाज येत असल्याने पाहण्यासाठी ते घराबाहेर पडले. इतरांना वाचवण्यासाठी तो प्रयत्न करत होता. मात्र त्याचवेळी जमावाने त्याला खेचून नेले आणि माझ्या मुलाची हत्या केली' असं त्यांच्या आईने म्हटलं आहे. अंकित घरी न पोहोचल्याने कुटुंब अस्वस्थ झाले. मंगळवारपासून अंकित यांचे कुटुंबीय त्यांच्या शोधात होते. अंकित यांचे वडील रवींदर शर्मा हेही आयबीमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. मारहाणीबरोबरच अंकितलाही गोळ्या घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अंकित शर्मा यांच्या भावाने एका चॅनेलशी बोलताना सांगितले, सीएए आणि एनआरसीच्या नावाखाली जो हिंसाचार होतोय, लोकांना मारलं जात आहे. ते बंद करावं. माझं घर उद्ध्वस्त झालं. अंकीत कामावरुन परतत असताना साडेचार वाजता गल्लीच्या बाहेर त्यांना खेचून नेलं. विभागाच्या नगरसेवकाचे लोक त्याला घरातून घेऊन गेले. अनेक व्हिडिओ असे दिसतायेत ज्यात नगरसेवक ताहिर हुसैन घराच्या गच्चीवर रॉडसह उभा आहे. त्यांच्यासोबत समर्थकही होते. भाजपा नेते अमित मालवीय यांनी ट्विट करुन ताहिर हुसैन यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
सीएए कायद्यावरुन दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा हिंसक वळण लागलं. सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले. या हिंसाचारात अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. यातच उत्तर पूर्व दिल्लीतील खजूरी परिसरातून तीन दिवसापूर्वी परीक्षा देण्यासाठी गेलेली शाळकरी 13 वर्षाची शाळकरी मुलगी अद्याप बेपत्ता आहे. पोलिसांनी सांगितले की, 8 वीच्या वर्गात शिकणारी सोनिया विहार येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहते. सोमवारी सकाळी ती शाळेत जाण्यासाठी गेली, जवळपास साडेचार किमी अंतरावर तिची शाळा आहे. मात्र ती अद्याप परतली नाही. रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय असणाऱ्या तिच्या वडिलांनी सांगितले की, मला संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी मुलीला शाळेतून आणण्यासाठी जायचं होतं. पण आमच्या भागात सुरु झालेल्या दंगलीमुळे मी अडकलो. तेव्हापासून माझी मुलगी बेपत्ता असल्याचं ते म्हणाले.
बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी दिल्ली हिंसाचारावर भाष्य केलं आहे. दिल्लीतील हिंसाचारावरून राजकीय पक्ष घाणेरडं राजकारण खेळत असल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक सल्ला देखील दिला आहे. 'दिल्लीतील हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण खेळलं जात आहे. केंद्राने कोणताही हस्तक्षेप न करता पोलीस व यंत्रणेस स्वतंत्ररित्या काम करू दिलं पाहिजे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी देखील अन्य राज्यांमध्ये राजकारण करण्यापेक्षा, दिल्लीतील परिस्थिती सर्वसामान्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे' असं मायावती यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
China Coronavirus : जगाला 'कोरोना'चा विळखा! आरोग्यमंत्र्यांनाच झाली लागण
Delhi Violence : 'दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण'
Delhi Violence : गृहमंत्री अमित शाह यांना हटवा, सोनिया गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी
Delhi Violence: आप नगरसेवक ताहीर हुसैन यांच्या घरात सापडला दगड-विटा, पेट्रोल बॉम्बचा साठा