स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:05 IST2025-06-03T09:03:51+5:302025-06-03T09:05:00+5:30
विशेष न्यायालयाकडून १० जानेवारी २०२५ रोजी त्यांना जामीन मिळाला होता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या बदनामीकारक वक्तव्यांमुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी रेंगाळावी यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा आरोप करणारी याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली आहे. अर्जात राहुल गांधी यांच्याविरोधात कठोर कारवाईची व त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. विशेष न्यायालयाकडून १० जानेवारी २०२५ रोजी त्यांना जामीन मिळाला होता.
वकिलाच्या निधनामुळे सुनावणी पुढे ढकलली
राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी सोमवारी पुढे ढकलण्यात आली. सुलतानपूरच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी होणार होती. मात्र, वकिलाच्या निधनामुळे इतर वकील अनुपस्थित राहिल्याने सुनावणी पुढे ढकलली गेली.
राहुल यांची झारखंड उच्च न्यायालयात धाव
राहुल गांधी यांनी चाईबासा न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २६ जून रोजी चाईबासा न्यायालयात वैयक्तिकरीत्या हजर राहण्याचे विशेष न्यायालयाने दिले होते.