लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 17:27 IST2020-04-24T17:22:20+5:302020-04-24T17:27:50+5:30
लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमधून मोलमजुरीसाठी परराज्यात गेलेल्या मजुरांचे प्रणाम लक्षणीय आहे.

लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
लखनौ - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमधून मोलमजुरीसाठी परराज्यात गेलेल्या मजुरांचे प्रणाम लक्षणीय आहे. दरम्यान, परराज्यात अडकलेल्या या मजुरांसाठी उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कामधंद्यानिमित्त बाहेर गेलेल्या आणि लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजुरांना टप्प्याटप्प्याने राज्यात परत नेण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. मुखमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासाठी योजना तयार करण्याचे आणि कामगारांची यादी तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. उत्तर प्रदेश सरकार राज्याचा सीमेवरूनच मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसची सोय करणार आहे. या सर्व कामगारांना क्वारेंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल किंवा घरीच क्वारेंटाईन करण्यात येईल. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने यापूर्वी राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात परत नेले होते. मात्र योगी सरकारच्या या निर्णयावर नितीश कुमार आणि हेमंत सोरेन यांच्यासारख्या मुखमंत्र्यांनी टीका केली होती.