Coronavirus: शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी उठवला आवाज; लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 17:37 IST2020-04-08T17:33:39+5:302020-04-08T17:37:12+5:30
देशभर राबविण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन 25 मार्चपासून सुरू झाला आणि 14 एप्रिल रोजी संपणार आहे. तरीही तो पुढे वाढवण्याचा मोदी सरकारने संकेत दिले आहेत.

Coronavirus: शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी उठवला आवाज; लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी
नवी दिल्लीः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकर्यांचं कंबरडं अक्षरशः मोडलं आहे. शेतीपासून बाजारापर्यंत माल पोहोचवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. शेतकऱ्यांसाठी आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आवाज उठवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतक-यांच्या हितासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, लॉकडाऊन सुरक्षितरीत्या काढणं शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. रब्बी हंगामातील पिकं शेतात उभी राहिलेली असून, लॉकडाऊनपायी कापणीचे काम कठीण झाले आहे. यामुळे शेकडो शेतकर्यांची उपजीविका धोक्यात आली आहे. देशातील अन्नदाता शेतकरी आज या दुहेरी संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर राबविण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन 25 मार्चपासून सुरू झाला आणि 14 एप्रिल रोजी संपणार आहे. तरीही तो पुढे वाढवण्याचा मोदी सरकारने संकेत दिले आहेत.
परराष्ट्र धोरणात घाबरून निर्णय घेणं हा देशवासीयांचा अपमान- कॉंग्रेस
दुसरीकडे परराष्ट्र धोरणात घाबरून निर्णय घेणं हा देशवासियांचा अपमान असल्याचा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरिया औषधासंदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर कॉंग्रेसने बुधवारी सरकारला फटकारले. पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील परराष्ट्र धोरण व पूर्वीच्या परंपरेतून विद्यमान सरकारने काही तरी शिकले पाहिजे. त्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे सांगितले की, 'आम्ही जागतिक समुदायाला कुटुंब मानतो. आम्ही नेहमीच लोकांना मदत करत आलो आहोत. परंतु जर कोणी आम्हाला धमकी दिली तर ते स्वीकारले जाऊ शकत नाही. भारत कधीही कोणासमोर झुकला नाही.
१९७१मध्ये बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामात ब्रिटन आणि अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. जेणेकरून इतर कुठलाही देश भारताच्या अंतर्गत विषय आणि आपल्या राष्ट्रीय हिताच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचं धाडस करणार नाही. सरकारने आपली ही परंपरा लक्षात ठेवली पाहिजे. कॉंग्रेस नेते म्हणाले, "परराष्ट्र धोरण हा एक राजकीय विषय नाही आणि यावर आम्ही आणि सर्व पक्ष सरकारबरोबर उभे आहोत, परंतु भीतीमुळे कोणताही निर्णय घेतला जाईल, तर तो देशातील १३० कोटी जनतेचा अनादर ठरेल."राबी की फसल खेतों में तैयार खड़ी है लेकिन #Covid19 लॉक्डाउन में कटाई का काम मुश्किल है।सैकड़ों किसानों की जीविका ख़तरे में है।देश के अन्नदाता किसान आज इस संकट में दोहरी मुसीबत में हैं। कटाई के लिए सुरक्षित तरीक़े से लॉक्डाउन में ढील देना एकमात्र रास्ता है।https://t.co/fOc2cUA10D
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 8, 2020