CoronaVirus News : देशात १०,०३,८३२ कोरोना रुग्ण, मृत्युदर २.५ टक्क्क्यांवर, २४ तासांत ३४,९५६ नवे बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 07:19 IST2020-07-18T06:33:14+5:302020-07-18T07:19:38+5:30
CoronaVirus News : आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या २५ हजार ६०२ झाला असला तरी एकूण रुग्णांच्या तुलनेत देशातील मृत्युदर २.५ टक्के इतका खाली आला आहे, ही समाधानाची बाब आहे.

CoronaVirus News : देशात १०,०३,८३२ कोरोना रुग्ण, मृत्युदर २.५ टक्क्क्यांवर, २४ तासांत ३४,९५६ नवे बाधित
नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३४,९५६ नवे रुग्ण आढळून आले असून ही आजवरची सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १० लाखांवर गेली असली तरी त्यापैकी 6 लाख 35 हजर जण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या २५ हजार ६०२ झाला असला तरी एकूण रुग्णांच्या तुलनेत देशातील मृत्युदर २.५ टक्के इतका खाली आला आहे, ही समाधानाची बाब आहे.
शुक्रवारी आणखी एक विक्रम नोंदविला गेला तो म्हणजे कोरोनाच्या आजारातून २२,९४२ जण पूर्णपणे बरे झाले. या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६,३५,७५७
झाली असून ३,४२,४७३ कोरोना रुग्णांवरच सध्या उपचार सुरू आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.३३ टक्के इतके आहे.
कमी बुद्धीचे लोक घालत नाहीत मास्क
कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे, सतत हात धुणे आणि फिजिकल डिस्टंसिंग या गोष्टी आवश्यक आहेत. पण जे लोक या गोष्टी पाळत नाहीत त्यांची बौद्धीक क्षमता कमी असते.
म्हणजे ते कमी बुद्धीमान असतात, असा निष्कर्ष यूनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्नियाच्या रिसर्चमधून करण्यात आला. अशा लोकांकडे चूक किंवा योग्यचा निर्णय घेण्याची मानसिक क्षमता नसते, असेही हा रिसर्च म्हणतो. या रिसर्चसाठी अमेरिकेतील ८५० लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
राज्यात नऊ जिल्ह्यांत ९३ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण
मुंबई : कोरोनाचा केंद्रबिंदू आता मुंबईकडून अन्य महानगरांकडे सरकत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत ठाण्यापाठोपाठ आता पुण्यानेही मुंबईला मागे टाकले आहे. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी १ लाख १२ हजार ३३६ रुग्ण राज्यातील नऊ जिल्ह्यांत असून उर्वरित सर्व जिल्ह्यांत मिळून फक्त ८१४४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात ८,३०८ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
६४० पैकी ६२७ जिल्ह्यांमध्ये रुग्ण
लॅन्सेट ग्लोबलच्या अहवालानुसार देशाचा ९८ टक्के भाग कोरोनाच्या विळख्यात असून, ६४० जिल्ह्यांपैकी ६२७
जिल्ह्यांमध्ये रुग्ण आहेत.
कोरोनाचा फैलाव वाढलेल्या भागांत लॉकडाऊन किंवा अन्य निर्बंध लागू करणे आवश्यक आहे, असे
लॅन्सेटने म्हटले आहे.
मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा व गुजरात या ९ राज्यात स्थिती चिंताजनक आहे. ईशान्य भारतामधील स्थिती तुलनेने चांगली आहे.