CoronaVirus News: "श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 07:53 AM2020-05-06T07:53:50+5:302020-05-06T08:04:23+5:30

शिवसेनेचा योगी आदित्यनाथ यांना सवाल; व्होट बँकेवरून जोरदार टीका

CoronaVirus marathi News shiv sena slams yogi adityanath government over migrant labour issue kkg | CoronaVirus News: "श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"

CoronaVirus News: "श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"

googlenewsNext

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सगळेच उद्योग ठप्प झाल्यानं मजुरांचे हाल सुरू आहेत. महाराष्ट्रातून माघारी परतणाऱ्या उत्तर भारतीय मजुरांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. यावरुन शिवसेनेनं सामनामधील अग्रलेखातून भाजपाला लक्ष्य केलं आहे. कालपर्यंत हा मजूरवर्ग म्हणजे अनेक राजकीय पक्ष व पुढार्‍यांची 'व्होट बँक' बनली होती. पण आता व्होट बँकेचा कचरा कोणालाच आपल्या अंगणात नको आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबई-महाराष्ट्र परराज्यांमधून आलेल्या श्रमातून उभा राहिला अशी काही जणांकडून बतावणी सुरू होती. आता या मुंबईचे उपरे मालक संकटकाळी पलायन करीत आहेत व त्यांचे राजकीय मालक-पालक तोंडात मास्कचे बोळे कोंबून घरातच बसले आहेत. या श्रमिकांना आता कोणीच वाली उरलेला दिसत नाही. आज या हिंदी भाषिकांसाठी त्यांच्या राज्याचे दरवाजे बंद केले गेले आहेत. सीमेवरूनच परत जा, अशी अरेरावी त्या त्या राज्यांनी केली हे बेईमानीचेच लक्षण म्हणावे लागेल. पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच हा प्रकार निर्घृण आणि अमानुष आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं उत्तर प्रदेश सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे.

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत जो 'यू टर्न' घेतला आहे तो माणुसकीस धरून नाही. आपल्याच लोकांशी असे क्रूरपणे वागणे कोणालाच शोभत नाही. सोप्या मराठी भाषेत त्यास बगला वर करणे म्हणतात व उत्तर प्रदेश प्रशासनाने अशा बगला वर केल्याने 30-35 लाख हिंदी मजूरवर्गाच्या जीवाची तडफड सुरू आहे. कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे मुंबईसह राज्याच्या विविध भागांत मजूरवर्ग अडकून पडला, त्यांना आपल्या मूळ राज्यात जाण्याची परवानगी आता केंद्र सरकारने दिली आहे. उत्तर प्रदेश-बिहारचे सर्वाधिक मजूर मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत राहतात. हा आकडा 25-30 लाखांच्या घरात असावा व या लाखो लोकांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी झुंबड उडवली आहे. सुरत येथे तर उत्तर प्रदेशातील हजारो मजूर रस्त्यावर उतरले. त्यांच्यावर लाठीमार करावा लागला. मुंबईतही वेगळी परिस्थिती नाही, पण या लाखो श्रमिकांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्वगृही घ्यायला तयार नाहीत. या सर्व श्रमिकांच्या कोरोना चाचण्या करा आणि नंतरच त्यांना पाठवा, अशी आडमुठी भूमिका घेऊन योगी सरकारने आपल्याच लेकरांना संकटकाळी लाथाडले आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

योगी आदित्यनाथांचं सरकार संकटकाळी गरीब-श्रीमंतांना वेगवेगळी वागणूक देत असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे. योगी सरकारने राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना आणण्यास शेकडो बस पाठवल्या व त्यांना विनाचाचण्या आणण्यात आले. कारण ही श्रीमंतांची मुले होती, पण मजूरवर्गास मात्र कोणी वाली नाही. हा मजूरवर्ग आपल्या गृहराज्यात न आलेलाच बरा या भावनेतून अटी-शर्ती टाकल्या जात आहेत, असं म्हणत गरीब-श्रीमंतांना मिळत असलेल्या वर्तणुकीवर बोट ठेवण्यात आलं आहे. 

मजुरांच्या रेल्वे तिकिटांवरुन शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. श्रमिकांना आणायचे कसे? त्यांच्या रेल्वे, बसेसची तिकिटे काढायची कोणी? हा मोठा प्रश्न गाजू लागला. रेल्वे म्हणते, कोणाला फुकटात सोडणार नाही. बसवालेसुद्धा तेच सांगत आहेत व आपापल्या लोकांना परत आणण्यास राज्य सरकारे श्रमिकांचा भार वाहायला तयार नाहीत. अशावेळी श्रीमती सोनिया गांधी या माणुसकीच्या नात्याने पुढे आल्या व त्यांनी आपापल्या राज्यांत जाऊ इच्छिणार्‍या श्रमिकांच्या गाडी-भाडय़ाचा भार काँगेस पक्ष सोसेल, असे जाहीर करताच अनेकांना मळमळ सुरू झाली. स्वत:ला तळमळ नाही, दुसर्‍यांनी केलं की मळमळ व्यक्त करायची, अशा शब्दांत शिवसेनेनं मोदी सरकावर टीकेची झोड उठवली आहे.

मुंबईत पुन्हा कडक निर्बंध; जीवनावश्यक वस्तूच मिळणार तर मद्य विक्री बंद

राज्यांकडून पुरेशा चाचण्या नाहीत; महाराष्ट्राने चाचण्या वाढवण्याची गरज, केंद्र चिंतेत

कोरोनाच दोषी का? अर्थसंकल्पावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ सरकारवर ओढवली

Web Title: CoronaVirus marathi News shiv sena slams yogi adityanath government over migrant labour issue kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.