नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,87,62,976 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,86,452 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3498 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,08,330 आपला जीव लोकांना गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. तसेच या संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं देखील गमावली आहेत. कोरोनामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत.
कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेक डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये घडली आहे. एका डॉक्टरने आपल्या कुटुंबातील तीन सदस्य कोरोनामुळे गमावले आहेत. मात्र तरी देखील ती डॉक्टर हे दु:ख बाजूला सारून रुग्णांची मदत करत आहे. स्वप्ना असं या डॉक्टरचं नाव आहे. कोरोनाने डॉक्टर स्वप्ना यांची आई, वडील आणि भाऊ त्यांच्याकडून हिरावले. मात्र, तरीही स्वप्ना यांनी आपलं काम न सोडता त्या कोरोना रुग्णांवर उपचार करत राहिल्या.
डॉक्टर स्वप्ना यांचे पतीही डॉक्टर असून ते सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. बिहारच्या मुझफ्फरपूर येथील रहिवासी असलेल्या डॉक्टर स्वप्ना आपल्या पती आणि दोन मुलांसोबत राहातात. त्या स्त्रीरोगतज्ञ आहेत. अशात त्यांच्यावर कोरोनाबाधित महिलांची प्रसूती आणि त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात डॉक्टर स्वप्ना यांच्या वडिलांचं निधन झालं. ते रुग्णांवर उपचार करत होते. कुटुंबीयांनी सांगितलं, की अधिक वय असल्यानं कोरोना काळात रुग्णांवर उपचार करण्यास त्यांना नकार दिला होता. मात्र, या कठीण काळात आपण रुग्णांवर उपचार करणार असल्याच्या निर्णयावर ते ठाम होते. याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाली.
काही दिवसांपूर्वी स्वप्ना यांच्या कोरोनाबाधित आईचंही निधन झालं. त्यांच्या आईला मुझफ्फरपूरमधील कोणत्याही रुग्णालयात बेड मिळाला नाही. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. तसेच स्वप्ना यांचा 39 वर्षाचा भाऊ आयटी कंपनीत एचआर होता. सात दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना पाटणाच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी रात्री एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. स्वप्ना यांना कुटुंबीयांसहीत क्वारंटाईन केलं आहे. महामारीदरम्यान रुग्णांवर उपचार करणं हे माझं कर्तव्य आहे असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.