Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:35 IST2025-06-20T12:34:50+5:302025-06-20T12:35:10+5:30
Corona Virus : राजस्थानच्या जोधपूरमधील एका ४ दिवसांच्या नवजात बाळाला आणि जयपूरमधील एका महिन्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे.

Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या जोधपूरमधील एका ४ दिवसांच्या नवजात बाळाला आणि जयपूरमधील एका महिन्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे.
राजस्थानमध्ये कोरोनाचे ५८३ रुग्ण आढळले आहेत. ज्यातील काही लोकांनी कोरोनावर मात केली तर काहींवर उपचार सुरू आहेत. तसेच दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा नवीन सब व्हेरिएंट JN.1 च्या उपस्थितीमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याचं मानलं जात आहे आणि त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी सर्व नवीन रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
वैद्यकीय विभागाचे संचालक डॉ. रवी प्रकाश शर्मा म्हणाले की, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि लोकांना घाबरण्याची गरज नाही. त्यांनी मास्क घालण्याचा, सोशल डिस्टंसिंगचा आणि लक्षणं आढळल्यास त्वरित चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खिमसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने अद्याप कोणतीही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत परंतु सर्व रुग्णालयांना लक्षणं असलेल्या रुग्णांची चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रुग्णालयांना ऑक्सिजन, औषधं आणि इतर आवश्यक उपकरणांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यास सांगितलं आहे. सवाई मान सिंग (एसएमएस) हॉस्पिटल, जयपूर आणि एम्स जोधपूर सारख्या प्रमुख वैद्यकीय संस्थांमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.