नवी दिल्ली - देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा आकडा केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 10,229 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. पण असं असताना कोरोना लसीबद्दल लोकांच्या मनात अद्यापही संभ्रम असलेला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी लसीबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण असून त्यांनी लस घेण्यास नकार दिला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशमध्ये आताही कोरोना लसीकरणावरून लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या टीमला काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावामध्ये लसीकरणाच्या टीमसोबत गेलेल्या एका कर्मचाऱ्याला लसीचं महत्त्व पटवून देणं चांगलंच महागात पडलं आहे. त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या श्योपूर जिल्ह्यातील एका गावामध्ये कोरोना लसीकरणाच्या टीमसोबत असलेल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
कर्मचाऱ्याला ग्रामस्थांनी लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, श्योपूर जिल्ह्यातील गावात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला आरोग्य विभागाच्या एका टीमला बोलावण्यात आलं होतं, त्यावेळी कर्मचारी माखन पटेलिया देखील उपस्थित होते. पटेलिया कोरोना लसीकरणाचं महत्त्व पटवून देत होते. मात्र हे होत असताना काही लोक नाराज झाले. त्यांनी कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. गावामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 10,229 नवे रुग्ण, 125 जणांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (15 नोव्हेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,44,47,536 वर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 1,34,096 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 4,63,655 जणांनी आपला जीव गमावला आहे. देशात 3,38,49,785 जणांनी कोरोनावर मात केली आहे. लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 1,12,34,30,478 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.