देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षात वाद, बहिणीने भावावर केले असे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:19 IST2025-05-30T17:18:39+5:302025-05-30T17:19:21+5:30
BRS News: देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षामध्ये वादाला तोंड फुटण्याचे संकेत मिळत आहेत. तेलंगाणाचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षामध्ये सुरू असलेली अंतर्गत कुरबूर आता उघडपणे समोर येऊ लागली आहे.

देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षात वाद, बहिणीने भावावर केले असे आरोप
देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षामध्ये वादाला तोंड फुटण्याचे संकेत मिळत आहेत. तेलंगाणाचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षामध्ये सुरू असलेली अंतर्गत कुरबूर आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार आणि के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी बीआरएसमधील काही नेते पक्षाचं भाजपामध्ये विलिनीकरण करण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला आहे. मी तुरुंगात असताना या गोष्टीला विरोध केला होता. तसेच पक्षाला वाचवण्यासाठी आणखी एक वर्षभर तुरुंगात राहण्यास तयार होते, असेही त्यांनी सांगितले.
के. कविता यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांचा भाऊ आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामाराव यांना लक्ष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, के.टी. रामाराव हे पक्षांतर्गत गद्दारांवर कुठलीही कारवाई करत नाही आहेत. तसेच काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला उत्तरही देत नाही आहेत. कविता यांनी पुढे सांगितले की, पक्षामध्ये मला एकटं पाडण्यासाठी आणि वडील के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत असलेलं नातं कमकुवत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
कविता पुढे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी वडील के. चंद्रशेखर राव यांना एक पत्र लिहिलं होतं. मात्र माझी बदनामी करण्यासाठी हे पत्र पक्षातीलच काही नेत्यांनी फोडलं. हे पत्र फोडणाऱ्यांवर करणाऱ्यांवर पक्षाच्या नेतृत्वाने आतापर्यंत कुठलीही कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एवढंच नाही तर हे पत्र फोडणाऱ्यांनी सोशल मीडिया ट्रोल्स आणि परदेशी माध्यमांचाही माझ्या बदनामीसाठी उपयोग करून घेतला.
दरम्यान, के. कविता यांनी केलेल्या आरोपांनंतर भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसमध्ये पक्षाच्या उत्तराधिकाऱ्यावरून संघर्ष तीव्र झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. के. चंद्रशेखर राव अद्याप राजकारणात सक्रिय आहेत. मात्र पक्षात दोन गट तयार झाले असून, एका गटामध्ये केटीआर यांचे समर्थक आणि दुसऱ्या गटात कविता यांचे समर्थक आहेत.