नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप आप पक्षाने गुरुवारी केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, राज्यसभा खासदार व आपचे नेते संजयसिंह यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले.
संजय सिंह यांनी सांगितले की, इंडिया आघाडीतील ऐक्याला काँग्रेस सुरूंग लावत आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीत आपने काँग्रेसवर टीका केली नव्हती. मात्र काँग्रेसची सध्याची वक्तव्ये भाजपची भाषा बोलत असल्याचा भास होतो. काँग्रेस नेते अजय माकन, संदीप दीक्षित भाजपऐवजी आपवरच टीका करत आहेत. अरविंद केजरीवाल देशद्रोही असल्याची टीका करून माकन यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत.