काँग्रेसने आसामची जमीन घुसखोरांना सोपवली, पंतप्रधान मोदींचा आरोप; 'महाजंगल राज' संपवण्याची दिली हाक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 08:00 IST2026-01-19T08:00:07+5:302026-01-19T08:00:27+5:30
'काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर' प्रकल्पाच्या कोनशिलेचे केले अनावरण

काँग्रेसने आसामची जमीन घुसखोरांना सोपवली, पंतप्रधान मोदींचा आरोप; 'महाजंगल राज' संपवण्याची दिली हाक!
कलियाबोर (आसाम) : ईशान्येकडील प्रमुख राज्य असलेल्या आसाममध्ये काँग्रेसने आपल्या सत्तेच्या काळात मतांसाठी या राज्यातील जमीन घुसखोरांकडे सोपवली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नगांव जिल्ह्यात आयोजित एका जाहीरसभेत केली.
सभेत बोलताना मोदी यांनी आरोप केला की, काँग्रेसच्या सत्ताकाळात आसाममध्ये कित्येक दशके घुसखोरी वाढत राहिली, अनेक अवैध प्रवासी येथील वनजमिनी, पशू आणि वस्त्यांवर तसेच पारंपरिक संस्थांवर अतिक्रमण करीत राहिले. भाजप सरकार या घुसखोरांची हकालपट्टी करून आसामची खरी ओळख आणि येथील संस्कृतीचे रक्षण करीत असल्याचे त्यांनी नमूद केले
आदिवासी क्षेत्रांतील जमिनींवर अवैधरीत्या ताबा घेतला जात आहे. हे प्रकार आसामच नव्हे, देशाच्या सुरक्षेलाच धोका असल्याचे मोदी म्हणाले.
दोन अमृत भारत रेल्वेंना दाखवला हिरवा झेंडा
या सभेपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नगांव जिल्ह्यात ६,९५७ कोटी रुपयांच्या 'काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर' प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले. तसेच दोन अमृत भारत रेल्वेंना डिजिटल माध्यमातून हिरवी झेंडी दाखवली. यानंतर त्यांची जाहीरसभा झाली.
'महाजंगल राज' संपवण्याची दिली हाक!
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सिंगूर येथे आयोजित सभेत त्यांनी बंगालमधील सद्यस्थितीचे वर्णन 'महाजंगल राज' असे केले. ते संपवणे राज्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
घुसखोरीमुळे आज लोकसंख्येचे संतुलन बिघडत आहे, संस्कृतीवर हल्ले होत आहे आणि गरीब-युवकांचा रोजगार हिरावला जात आहे- नरेंद्र मोदी, पंतप्रधान