ऑनलाईन गेमने वेड लावलं, मानसिक संतुलन बिघडलं; मित्रांनी 'त्याला' बांधून ठेवलं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 13:09 IST2022-03-28T13:08:36+5:302022-03-28T13:09:47+5:30
Online Game : ऑनलाईन गेमने एका तरुणाला वेड लावलं. ज्यामुळे त्यांचं मनासिक संतुलन इतकं बिघडलं की तो सैरावैरा पळू लागला. आता त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्याला बांधून ठेवलं आहे.

ऑनलाईन गेमने वेड लावलं, मानसिक संतुलन बिघडलं; मित्रांनी 'त्याला' बांधून ठेवलं, नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली - सध्या ऑनलाईन गेमची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. पण अनेकदा गेमचा नाद जीवावर बेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक अजब घटना घडली आहे. ऑनलाईन गेमने एका तरुणाला वेड लावलं. ज्यामुळे त्यांचं मनासिक संतुलन इतकं बिघडलं की तो सैरावैरा पळू लागला. आता त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्याला बांधून ठेवलं आहे. राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.
एका तरुणाला ऑनलाइन गेमचं इतकं व्यसन लागलं की शेवटी त्याला दोरीने बांधन ठेवण्याची वेळ आली आहे. इरफान असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून त्याला फ्री फायरचं व्यसन लागलं होतं. तो तासनतास फ्री फायर खेळत बसायचा. ज्याचा आता त्याच्या डोक्यावर विपरित परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्यावर वाहनं थांबवून तो तरुण हॅकर-हॅकर ओरडायचा. त्याचं हे कृत्य पाहून नागरिकांनी त्याला दोरीने बांधलं. दोरी सोडताच तो पुन्हा पळून जातो.
मिळालेल्या माहितीनुसार, इरफान काही दिवसांपूर्वीच बिहारमधून परतला असल्याचं सांगण्यात येत आहे. तासंतास तो मोबाइलवर ऑनलाईन गेम खेळायचा. गुरुवारी रात्री गेम खेळत असताना अचानक त्याचा फोन बंद झाला. त्यानंतर तो वेड्यासारखा वागू लागला आणि 'हॅकर आला, पासवर्ड बदलला, आयडी लॉक झाला,' अशी बडबड करू लागला. त्याच्या कुटुंबाचं म्हणणं आहे, की त्याने फ्री फायर गेम या ऑनलाईन गेममुळे वेड्यासारखं वागण्यास सुरुवात केली. रात्रभर घरच्यांनी त्याला समजावून सांगितलं; मात्र त्यानं ऐकलं नाही आणि सकाळी अचानक तो महामार्गावर धावू वेगाने लागला.
नागरिकांना थांबवून हॅकर्स आणि आयडी हॅक याबद्दल बोलू लागला. तो ऐकत नसल्याचं समजल्यावर सर्वांनी त्याला पकडून दोरीने बांधलं. मोबाईल खराब झाल्याने तरुणाची मानसिक स्थिती बिघडल्याचं बनसेन गावातल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्याच्या हातात मोबाईल असताना तो लोकांवर चोरीचा आरोप करू लागला होता, असं ग्रामस्थ सांगतात. आपला मोबाइल कोणी तरी चोरल्याचं तो वारंवार सांगत होता. एवढंच नाही, तर तो आणखी काही विचित्र गोष्टी करू लागला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे,