भारताला मोठं यश; लडाखमध्ये चिनी सैन्याची अडीच किलोमीटरपर्यंत माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 17:45 IST2020-06-09T17:26:55+5:302020-06-09T17:45:55+5:30
पूर्व लडाखच्या गलवानमधून भारतीय सैन्याचे काही जवान माघारी परतले

भारताला मोठं यश; लडाखमध्ये चिनी सैन्याची अडीच किलोमीटरपर्यंत माघार
लडाख: गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आलं होतं. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. मात्र दोनच दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याचा सकारात्मक परिणाम आज पाहायला मिळाला. पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकलं आहे. चिनी सैन्यानं त्यांची वाहनंदेखील मागे घेतली आहेत. त्यानंतर भारतानंदेखील आपले काही जवान मागे घेतले आहेत.
लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. मात्र आता लडाखमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरून चिनी सैन्य मागे सरकलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं याबद्दलची माहिती दिली आहे. चिनी सैन्यानं माघार घेतल्यानंतर काही भारतीय जवानदेखील मागे सरकले. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान गलवान, पेट्रोलिग पॉईंट १५ आणि हॉट स्प्रिंग परिसरातून अडीच किलोमीटर मागे गेल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. त्यानंतर भारतानंही काही जवानांना माघारी बोलावलं.
India and China disengage at multiple points in Eastern Ladakh. Troops and infantry combat vehicles moved back by 2.5 km by People’s Liberation Army in Galwan area, Patrolling Point 15 and Hot Springs area. India has also moved some of its troops back: Top Govt Sources to ANI pic.twitter.com/2wIrBm67HD
— ANI (@ANI) June 9, 2020
सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये संवादाच्या माध्यमातून सीमा वाद सोडवण्यावर एकमत झालं. मात्र यानंतर सोमवारी चीननं कोणतीही सकारात्मक पावलं टाकली नाहीत. उलट युद्धाभ्यास सुरू करत भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पूर्व लडाखमधील गलवान भागातून चिनी सैन्य मागे हटलं आहे.
गलवानमध्येच भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर आता दोन्ही देशांनी या भागातील सैन्य माघारी बोलावण्यास सुरुवात केली. सोमवारी रात्रीपासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. चीननं सैन्य हटवल्यानं भारतानं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जवानांना परतण्याचे आदेश दिले.