...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:00 IST2025-06-10T16:59:40+5:302025-06-10T17:00:31+5:30

नौदलाचं जहाज आयएनएस सुरतने आग लागलेल्या जहाजावरील १८ क्रू मेंबर्सना वाचवले आहे. काही क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत आणि त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे

Chinese Embassy thanked Indian authorities for their swift rescue efforts in MV Wan Hai 503 kerala ship fire | ...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार

...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार

केरळच्या किनारपट्टीनजीक सिंगापूरच्या मालवाहतूक जहाजाला लागलेली आग विझवण्याचं काम अद्याप सुरू आहे. भारतीय नौदलाचे आयएनएस सूरतने या जहाजावरील १८ सदस्यांना सुरक्षित बाहेर काढले आहे तर ४ क्रू मेंबर्स अजूनही बेपत्ता आहेत. या जहाजाला रविवारी आग लागली होती. मागील २ दिवसांपासून भारतीय नौदल, कोस्ट गार्डसह संयुक्त अभियानाद्वारे मोहिम हाती घेण्यात आली आहे.

भारतीय तटरक्षक दलाची जहाजे सचेत आणि समुद्र प्रहारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तटरक्षक दलाचे डोर्नियर विमान बचाव कार्याचे हवाई सर्वेक्षण करत आहे. मंगळवारी तटरक्षक दलाचे जहाज समर्थ देखील बचाव कार्यात सामील झाले. सोमवारी केरळ किनाऱ्यापासून सुमारे ४४ नॉटिकल मैल अंतरावर सिंगापूरच्या एका मालवाहतूक जहाजाचा अपघात झाला. कोलंबोहून मुंबईला जाणारे सिंगापूरचा झेंडा असलेले जहाज एमव्ही वान है ५०३ अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीमुळे जहाजात मोठा स्फोट झाला.

या जहाजावर जवळपास ६५० कंटेनर आहेत, ज्यातील अनेक कंटेनर समुद्रात पडलेत. ज्या वेगाने ही आग भडकत आहे त्यामुळे जहाजातील कंटेनर्समध्ये एखादं ज्वलनशील रसायन असू शकतो असं म्हटलं जाते. सध्या जहाज कंपनी कंटेनर्स मालकांकडून त्यांनी ठेवलेल्या सामानाची माहिती मागवत आहे. नौदलाचं जहाज आयएनएस सुरतने आग लागलेल्या जहाजावरील १८ क्रू मेंबर्सना वाचवले आहे. काही क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत आणि त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. इतर चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. क्रू मेंबर्सना मंगळुरू बंदरात आणण्यात आले आहे. जखमींवर कुंतिकाना येथील एजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चीनी दूतावासाने भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचे मानले आभार 

जहाजाला लागलेल्या आगीच्या घटनेबद्दल भारतातील चीनचे राजदूत यू जिंग यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'जहाजातील क्रूमध्ये २२ लोक होते, त्यापैकी १४ चिनी नागरिक आहेत. सहा लोक तैवानचे आहेत. आम्ही भारतीय नौदल आणि मुंबई तटरक्षक दलाचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानतो. जखमी क्रू सदस्य लवकर बरे व्हावेत अशी आम्ही प्रार्थना करतो असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, केरळ समुद्र किनाऱ्यावर तेल गळतीचा इशारा जारी करण्यात आला आहे. सिंगापूरच्या जहाजाला भीषण आग लागल्यानंतर भारताच्या नॅशनल सेंटर फॉर ओसीन इंफोर्मेशन सर्व्हिस केंद्राने हा इशारा जारी केला आहे. जहाज अजूनही जळत आहे. नौदल आणि तटरक्षक दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Chinese Embassy thanked Indian authorities for their swift rescue efforts in MV Wan Hai 503 kerala ship fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.