रेल्वे अपघाताचा बनाव; पत्नीनेच सुपारी किलर्सच्या मदतीने पतीचे शीर धडावेगळे केले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:42 IST2026-01-19T14:41:28+5:302026-01-19T14:42:32+5:30
Chhattisgarh Crime: कारण ऐकून पोलिसही चक्रावले...

रेल्वे अपघाताचा बनाव; पत्नीनेच सुपारी किलर्सच्या मदतीने पतीचे शीर धडावेगळे केले...
Chhattisgarh Crime: छत्तीसगडमधील बलौदाबाजार जिल्ह्यातील भोथीडीह गावात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. काही दिवसांपूर्वीच येथे एका युवकाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला होता. तपासात समोर आले आहे की, ही हत्या मृतकाच्या पत्नीने सुपारी किलर्समार्फत घडवून आणली आहे. दरम्यान, हत्येमागील कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
रेल्वे ट्रॅकवर सापडला शिरच्छेद केलेला मृतदेह
हथबंद पोलीस ठाणे हद्दीतील हथबंद-भाटापारा रेल्वे ट्रॅकवर 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी स्थानिकांना एका व्यक्तीचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शीर गायब असल्याने सुरुवातीला हा रेल्वे अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मृतकाच्या उजव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत गोंदवलेल्या टॅटूमुळे तो भोथीडीह गावचा रहिवासी कुमार जोशी (वय 39) असल्याचे समोर आले.
पत्नीनेच आखला कट
पोलिस तपासात उघड झाले की, कुमार जोशी याच्या हत्येमागे त्याची पत्नी कुसुम जोशी हिचा हात होता. पोलिसांनी कुसुमला अटक केली असून, चौकशीत तिने धक्कादायक खुलासे केले आहेत. पतीकडून दीर्घकाळ मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचे, तसेच अनैसर्गिक संबंधांसाठी जबरदस्ती, मारहाण आणि इतर पुरुषांशी संबंध ठेवण्याचा दबाव टाकला जात असल्याचा दावा तिने केला आहे. या छळाला कंटाळून कुसुमने पतीला संपवण्याचा कट रचला.
40 हजारांत दिली हत्येची सुपारी
पोलिसांच्या माहितीनुसार, कुसुमने आपला मामा राजेश भारती (वय 32) याची मदत घेतली. त्यानंतर दारासिंह अनंत (वय 44) आणि करन अनंत (वय 34) या दोन कॉन्ट्रॅक्ट किलर्सशी संपर्क साधून 40 हजार रुपयांत हत्येची सुपारी देण्यात आली.
दारू पाजून मारहाण, नंतर शिरच्छेद
घटनेच्या दिवशी कुसुमने पतीला बहाण्याने दरचुरा गावातील मामाच्या घरी नेले. तिथे आधीच सुपारी किलर्स उपस्थित होते. सर्वांनी मिळून कुमारला दारू पाजली आणि जबर मारहाण केली. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला कारमधून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हथबंद-भाटापारा रेल्वे ट्रॅकजवळ नेण्यात आले. तिथे तलवारीने त्याचा शिरच्छेद करण्यात आला. हत्येनंतर धड रेल्वे ट्रॅकवर फेकून देण्यात आले, जेणेकरून हा प्रकार रेल्वे अपघात वाटावा. तर डोके सुमारे 10 किलोमीटर दूर नेऊन जमिनीत पुरण्यात आले.
चार दिवसांत उलगडा; सर्व आरोपी अटकेत
पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या होत असताना कुसुम घटनास्थळी उपस्थित नव्हती. ती मामाच्या घरीच थांबली होती, तर मामा आणि दोन्ही सुपारी किलर्सचा प्रत्यक्ष घटनेत सहभाग आहे. घटनेनंतर चार दिवस चाललेल्या तपास, शोधमोहीम आणि चौकशीनंतर पोलिसांनी या संपूर्ण हत्याकांडाचा पर्दाफाश केला असून पत्नी, मामा आणि दोन्ही कॉन्ट्रॅक्ट किलर्सना अटक करण्यात आली आहे.