MP Chandrashakhar Azad News: उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आझाद समाज(कांशीराम)पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्यावर पीएसडी स्कॉलर डॉ. रोहिणी घावारी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. दरम्यान, आता रोहिणी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या तक्रारीबाबत पत्र लिहिले असून, न्यायाची मागणी केली आहे.
चंद्रशेखर यांच्यावर आरोप करताना रोहिणी घावारी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, 'भारताची कन्या असल्याने मी नेहमीच जागतिक स्तरावर माझ्या देशाचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आता न्याय आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. मी माझी तक्रार राष्ट्रीय महिला आयोग आणि दिल्ली पोलिसांकडे केली आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.'
'या घटनेने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले असून, समाजातील लोक माझाच अपमान करत आहेत. दीर्घकाळ भीती आणि नैराश्यात राहिल्यानंतर आता माझ्यात न्याय आणि सन्मानासाठी लढण्याची हिंमत आली आहे. ही लढाई लाखो महिलांच्या स्वाभिमानासाठी आहे. ही कसली व्यवस्था, जिथे स्त्रीचा अपमान करण्यासाठी ठेवलेली, वेश्या असे शब्द वापरले जातात, पण दोषी पुरुषाला शिक्षा होत नाही. पंतप्रधान म्हणून मी तुम्हाला मला न्याय मिळवून देण्याची विनंती करते. मी सर्वत्र तक्रार पाठवली आहे. माझा माझ्या देशाच्या कायद्यावर पूर्ण विश्वास आहे,' असे तिने या पत्रात म्हटले आहे.
पोलिस आणि महिला आयोगाकडेही तक्रार या संदर्भात रोहिणी घावरी यांनी पोलिस आणि महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. ज्यामध्ये त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर संमतीशिवाय जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा, लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा, विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.