ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 00:11 IST2025-05-29T23:59:21+5:302025-05-30T00:11:37+5:30
चिंतन रघुवंशी असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांना २० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
ओडिशामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी भुवनेश्वरमध्ये लाच घेतल्याप्रकरणी ईडीच्या एका उपसंचालकाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ताब्यात घेतले.
चिंतन रघुवंशी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे, त्याला २० लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले.
खाणकाम प्रकरण संदर्भात ५० लाख रुपयांच्या संशयास्पद बेकायदेशीर व्यवहाराच्या चौकशी सुरू होती. या प्रकरणात सूट देण्यासाठी निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी रघुवंशी यांनी लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
सीबीआयने त्यांना लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांची आता चौकशी होणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने रघुवंशी यांना ५० लाख रुपयांच्या लाच व्यवहारात २० लाख रुपये स्वीकारताना अटक केली.
रघुवंशी काही खाण चालकांकडून त्यांच्याविरुद्धचा ईडीचा खटला रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच मागत होते. अखेर ५० लाख रुपयांची रक्कम लाच म्हणून ठरली होती.
तक्रारदाराने याबाबत सीबीआयला माहिती दिली. त्यानंतर सापळा रचण्यात आला आणि तक्रारदाराकडून २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रघुवंशी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ईडीच्या भुवनेश्वर विभागीय कार्यालयात उपसंचालक
IRS २०१३ च्या बॅचचे अधिकारी, रघुवंशी गेल्या दीड वर्षांपासून ईडीच्या भुवनेश्वर विभागीय कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.