सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं! लग्नानंतर काही मिनिटांत नववधू विधवा, नवरदेवाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 17:13 IST2023-05-06T17:12:00+5:302023-05-06T17:13:18+5:30
लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झालं आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं! लग्नानंतर काही मिनिटांत नववधू विधवा, नवरदेवाचा मृत्यू
लग्न समारंभात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीचं सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं. नवरदेवाचा मृत्यू झाल्य़ाने लग्नानंतर काही मिनिटांत नववधू विधवा झाली. विनीत प्रकाश असं नवरदेवाचं नाव असून मंगळसूत्र घातल्यावर तो बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला. नवरदेव बेशुद्ध पडताच नातेवाईकांनी तातडीने त्याला जवाहरलाल नेहरू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनिअर विनीत मुकुंद मोहन झा यांचा मुलगा होता. त्याचं लग्न झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील रहिवासी कुम्हार टोला यांच्या मुलीशी ठरलं होतं. बुधवारी रात्री मिरजन येथील विवाह मंडपात विवाह सोहळा आनंदात संपन्न होत असतानाच वराचा आकस्मिक मृत्यू झाल्याने लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झालं आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
पोलिसांनी विनीतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. याप्रकरणी मोजाहिदपूर पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर सर्व शंका दूर होतील, असे मोजाहिदपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणाले. विनीत आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत लग्नाचा आनंदा साजरा करत होता. तो अस्वस्थ वाटत नव्हता. वरात आली सगळे नाचत नाचू लागले. मंगळसूत्र घालताच तो बेशुद्ध पडला. त्यानंतर काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.
विनीतच्या नातेवाईकांनी आपली फसवणूक केल्याचे वधूच्या वडिलांनी सांगितले. त्यांना त्या मुलाबद्दल योग्य माहिती देण्यात आली नाही, काहीतरी समस्या असेल. कोणाचाही अचानक मृत्यू होत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वर विनीतच्या नातेवाईकांमध्येही शोककळा पसरली होती. रडून रडून त्याचीही अवस्था बिकट झाली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.