कलम 370, तिहेरी तलाक, CAA अन्...जेपी नड्डांनी वाचला मोदी सरकारच्या कामांचा पाढा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:41 IST2025-06-09T16:41:45+5:302025-06-09T16:41:59+5:30

BJP Government : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला आज ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

BJP Government: Article 370, triple talaq, CAA and... JP Nadda reads the work of Modi government | कलम 370, तिहेरी तलाक, CAA अन्...जेपी नड्डांनी वाचला मोदी सरकारच्या कामांचा पाढा...

कलम 370, तिहेरी तलाक, CAA अन्...जेपी नड्डांनी वाचला मोदी सरकारच्या कामांचा पाढा...

BJP Government : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रातील मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजकीय संस्कृती बदलून एक नवीन युग सुरू केले आहे. तुष्टीकरणाची जागा जबाबदारी, पारदर्शकता आणि विकासाने घेतली आहे. नड्डांनी मोदी सरकारचे वर्णन एक मजबूत सरकार असे केले. 

नड्डा पुढे म्हणाले, ११ वर्षांपूर्वी देश तुष्टीकरणाचे राजकारण पाहत होता, परंतु पंतप्रधान मोदींनी ते बदलले आणि जबाबदारीचे आणि रिपोर्ट कार्ड राजकारण सुरू केले. त्यांनी यावर भर दिला की, मोदी सरकारने एक नवीन व्यवस्था स्थापित केली आहे. हे असे सरकार आहे, जे भविष्याकडे पाहून काम करते. पूर्वीची सरकारे भ्रष्टाचारात बुडालेली आणि तुष्टीकरणावर विश्वास ठेवणारी होती, परंतु आम्ही नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे गेलो.

'मोदी है तो मुमकीन है'
आज भारतातील सामान्य नागरिक 'मोदी है तो मुमकीन है' असे मानतो. यावेळी नड्डांनी सरकारच्या तीन मुख्य कामगिरीवर प्रकाश टाकला: विकास, शोध आणि नवोन्मेष. ते म्हणाले, कामगिरी, सुधारणा आणि परिवर्तनाचा मंत्र आमच्या धोरणांमध्ये दिसून येतो. आम्ही 'सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास' हे तत्व स्वीकारले आहे.

कठोर निर्णयांमुळे...
भाजप अध्यक्षांनी सरकारच्या काही ऐतिहासिक निर्णयांचा उल्लेख केला, ज्यात कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक यांचा समावेश आहे. कलम ३७० हटवण्याचा संदर्भ देत ते म्हणाले, देशाने हे शक्य नाही हे मान्य केले होते, परंतु मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले. लोकसभेत ५८.४६ टक्के मतदान झाले, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत ६३ टक्के मतदान झाले. मोदी सरकारच्या धाडसी निर्णयामुळे हा बदल झाला आहे. तिहेरी तलाक रद्द करून आमच्या सरकारने महिलांना आदर आणि अधिकार दिले.

कर संकलनात २३८% वाढ
सरकारने देश आणि समुदायाचे हित बळकट करण्यासाठी नवीन वक्फ कायदा केला. आमच्या सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), नोटाबंदी, महिला आरक्षण आणि अर्थसंकल्पीय सुधारणा यासारखी पावले उचलली. भारत लवकरच जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. परकीय चलन साठा, निर्यात आणि थेट परकीय गुंतवणूक (FDI) मध्ये वाढ झाली आहे. कर संकलनातही २३८% वाढ झाली असल्याचे नड्डा म्हणाले.

आम्ही सर्व वर्गांची काळजी घेतली
नड्डा पुढे म्हणतात, सर्व प्रतिकूल परिस्थिती असूनही, भारताची अर्थव्यवस्था मजबूत पद्धतीने पुढे जात आहे. हे सरकार पारदर्शकतेचे एक नवीन उदाहरण मांडत आहे. गेल्या दशकात आम्ही एससी-एसटी-ओबीसींसह समाजाच्या सर्व वर्गांची काळजी घेतली आहे. त्याच प्रकारे आम्ही महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला पुढे नेले आहे. महिलांना वैमानिक बनवण्यापासून ते त्यांना सैन्यात कमिशन देण्यापर्यंत, सैनिक शाळांमध्ये प्रवेश देण्यापासून ते एनडीएमध्ये भरतीपर्यंत, लखपती दीदींपासून ते स्वयंसेवा गटांना प्रोत्साहन देण्यापर्यंत... मोदी सरकारमध्ये महिला आणि एससी-एसटी-ओबीसी सर्वांना मुख्य प्रवाहात जोडले गेले आहे.

२५ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले
आम्ही गरीबी हटावचा नारा घेऊन आलो नाही, तर गरिबांचे कल्याण करून दाखवले. हे आकडे याचा पुरावा आहेत... देशातील २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. अशाप्रकारे, अत्यंत गरिबी ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. चिनाब पुलाचा संदर्भ देत ते म्हणाले की, चिनाब पुलाची पायाभरणी १९९५ मध्ये नरसिंह राव यांच्या काळात झाली होती आणि अटलजींनी तो 'राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प' घोषित केला होता. पण, पंतप्रधान मोदींनी हा प्रकल्प पूर्ण केला आणि ६ जून २०२५ रोजी तो देशाला समर्पित केला. समस्या पुढे ढकलणे हे सरकारचे धोरण किंवा पद्धत राहिलेली नाही. सरकारने समाजातील सर्व घटकांची काळजी घेतली आणि त्यांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण पूर्ण ताकदीने विकसित भारताकडे झेप घेण्यास तयार आहोत, असेही नड्डा यावेळी म्हणाले.

Web Title: BJP Government: Article 370, triple talaq, CAA and... JP Nadda reads the work of Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.