Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:54 IST2025-10-15T15:50:16+5:302025-10-15T15:54:03+5:30
एनडीएतील नितीश कुमार विरुद्ध चिराग पासवान संघर्ष शमला असे वाटत असतानाच नवी ठिणगी पडली आहे. चिराग पासवान यांना हव्या असलेल्या जागांवरच नितीश कुमारांनी थेट उमेदवार उतरवले आहेत.

Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
Nitish Kumar vs Chirag Paswan Bihar Assembly Election 2025: नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्याच यादीतून नितीश कुमारांनीचिराग पासवान यांना स्पष्ट मेसेज दिला आहे. एनडीएचे घटक पक्ष असलेल्या दोन्ही पक्षातील सुप्त संघर्ष यानिमित्ताने समोर आला आहे. नितीश कुमारांच्या जदयूने चिराग पासवान यांनी दावा केलेल्या चार जागांवर आपले उमेदवार जाहीर करून टाकले आहेत.
जदयूने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. ५७ उमेदवारांची यादी जाहीर केली. पण यातील चार उमेदवार हे चिराग पासवानांना हव्या असलेल्या मतदारसंघातून उतरवले आहेत. या चार मतदारसंघातून आपण उमेदवार उतरवणार असल्याचे चिराग पासवानांनी जाहीर केले होते.
चिराग पासवानांना हवे होते 'ते' चार मतदारसंघ कोणते?
बिहारमधील मोरवा विधानसभा, सोनबरसा विधानसभा, मटिहानी विधानसभा आणि राजगीर विधानसभा मतदारसंघ चिराग पासवान यांना हवे होते आणि त्या मतदारसंघावर त्यांनी आधीच दावा केला होता. पण, नितीश कुमारांनी त्यांना झटका दिला.
विद्यमान आमदारांचे नितीश कुमारांनी तिकिटे कापली
५७ उमेदवारांच्या पहिल्या यादीत जदयूने ३० नवीन चेहरे दिले आहेत. २७ जणांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. परसा विधानसभा मतदारसंघातील लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाचे आमदार छोटे लाल राय यांनी जदयूमध्ये प्रवेश केला होता. त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्यावेळी जदयूने येथून चंद्रिका राय यांना तिकीट दिले होते.
कुशेश्वरस्थान मतदारसंघातून जदयूने भूषण हजारी यांचे तिकीट कापले आहे. येथून अतिरेक कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बरबिघा मतदारसंघाचे आमदार सुदर्शन कुमार यांचेही तिकीट कापण्यात आले आहे, त्यांच्याऐवजी डॉ. कुमार पुष्पंजय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
२०२० मध्ये जदयूने ११५ जागा लढवल्या होत्या. यावेळी एनडीएच्या जागावाटपात त्यांच्या वाट्याला १०१ जागा आल्या आहेत. ११५ जागा लढवत जदयूने ४३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळी विधानसभेतील कामगिरी उंचावण्याची चिंता पक्षाला आहे. त्यामुळेच पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.