बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 17:57 IST2025-11-09T17:57:36+5:302025-11-09T17:57:36+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ३ कोटी ७० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १.९५ कोटी पुरुष आणि १.७४ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे

बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
बिहार विधानसभा निवडणुकीचा उडालेला धुरळा आता बसू लागला आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून मतदानासाठी प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. ११ नोव्हेंबर रोजी २० जिल्ह्यांमधील १२२ विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. आज याचा प्रचार संपला असून रात्रीच्या प्रचाराला आता वेग येणार आहे.
बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ३ कोटी ७० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १.९५ कोटी पुरुष आणि १.७४ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण १,३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भविष्य आजमावत आहेत.
निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. तब्बल ४ लाखाहून अधिक सुरक्षा जवान विविध मतदान केंद्रांवर तैनात करण्यात येणार आहेत. नेपाळची सीमा ११ नोव्हेंबरपर्यंत सील करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये ६५ टक्के मतदान झाले होते. या वाढीव मतदानामुळे दुसऱ्या टप्प्यातील उरलेल्या प्रचाराच्या सभांना गर्दी जमविण्यासाठी सर्वच पक्ष मेहनत घेत होते. हा वाढलेला टक्का कोणाच्या बाजुने जाणार असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. १४ नोव्हेंबरला बिहार निवडणुकाचा निकाल लागणार आहे.
संवेदनशील मतदान केंद्रे आणि वेळेत बदल
दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण ४५,३३९ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी ४,१०९ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यातील ४,००३ बूथ 'अतिसंवेदनशील' गटात मोडतात. नक्षलग्रस्त भागांचा विचार करून, कटरिया, बेलहर, चैनपूर, कुटुंबा, औरंगाबाद, शेरघाटी यांसारख्या विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंतच चालणार आहे, तर इतर ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.