Bihar Assembly Election 2020: पराभूत झाल्यास नितीशकुमारांवर खापर; विजयी झाल्यास मोदींना श्रेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 07:05 IST2020-11-10T01:16:27+5:302020-11-10T07:05:06+5:30
आजच्या मतमोजणीकडे लागले लक्ष

Bihar Assembly Election 2020: पराभूत झाल्यास नितीशकुमारांवर खापर; विजयी झाल्यास मोदींना श्रेय
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची लोकप्रियता कमी झाल्याने राज्यातील विधानसभा निवडणुकीत एनडीएला विजय मिळाल्यास त्याचे श्रेयपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना जाईल. एनडीएचा पराभव झाला तर त्याचे खापर नितीशकुमारांच्या डोक्यावर फुटेल, अशी रणनीती भाजपची आहे.
बिहारमध्ये मंगळवारी मतमोजणी आहे. राजदचे तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला मोठे यश मिळेल, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. सेंटर फॉर डेव्हलपिंग सोसायटीजच्या पाहणीनुसार, २०१५ निवडणुकांनंतर नितीशकुमार यांच्याबद्दल ८० टक्के लोकांचे अनुकूल मत होते. आता हे प्रमाण ५२ टक्क्यांपर्यंत कमी झाले.
भाजपशासित राज्यांनाही बसला होता फटका
नितीशकुमारांच्या राजवटीत २०१९-२० या आर्थिक वर्षात बिहारच्या ठोकळ उत्पन्नाच्या ५० टक्के रक्कम समाजकल्याण योजनांवर खर्च करण्यात येत होती. त्याचे लाभ मिळत असूनही जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांकडे आकर्षित झाल्याचे दिसून आले. याआधीच्या विशेषत: भाजपशासित राज्यांतील विधानसभा निवडणुकांत तेथील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज जनतेने शिवराजसिंह चौहान, रमणसिंह यांना सत्तेवरून दूर केले होते. लोकप्रियता घटलेल्या नितीशकुमारांवरही हीच पाळी येणार, अशी चर्चा आहे.