निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 06:35 IST2025-08-08T06:35:19+5:302025-08-08T06:35:48+5:30
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने केले अनेक गैरप्रकार, कर्नाटकातील एका मतदारसंघाचे विश्लेषण केले सादर...

निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी एका दीर्घ पत्रकार परिषदेत भाजप व निवडणूक आयोगावर ‘मतचोरी’चा थेट आरोप केला. ते म्हणाले की, देशभरात निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून हा लोकशाहीवर अणुबॉम्बसारखा हल्ला आहे. २०२४ ची लोकसभा व त्यानंतरची विधानसभा निवडणूक म्हणजे निव्वळ फसवणूकच नव्हे, तर संविधानाच्या मूल्यांवर थेट हल्ला आहे. देशभरात एक मोठा गुन्हा घडतोय. भाजप व निवडणूक आयोग बनावट मतदार तयार करत आहेत. हा संविधानावर हल्ला आहे. याला गुन्हा समजले पाहिजे, असा घणाघात राहुल यांनी केला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार केले. कर्नाटकातील एका लोकसभा मतदारसंघातील डेटा विश्लेषणाच्या आधारे आम्ही या फसवणुकीचे भक्कम पुरावे मिळविले आहेत. निवडणूक आयोग देशभरात असे आणखी पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे, असाही दावा त्यांनी केला. एक दिवस विरोधक सत्तेत येतील. जे निवडणूक अधिकारी हे करत आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. संविधानाचा पाया हादरवणाऱ्यांना माफी नाही, असा इशारा राहुल यांनी दिला.
महाराष्ट्रात ४० लाख बनावट मतदार
महाराष्ट्रात अवघ्या पाच महिन्यांत लाखो मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. ४० लाख मतदारांच्या नावांबाबत संभ्रम आहे. संध्याकाळी ५ नंतर मतदानात अचानक झालेली वाढदेखील आश्चर्यकारक आहे. हे मतदान का वाढले? याचे उत्तर निवडणूक
आयोगाने द्यावे.
राज्य निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी राहुल यांना पत्र लिहून, मतदार यादीत अयोग्यरित्या समाविष्ट किंवा वगळले गेलेल्या नावांचे तपशील असलेले सहीयुक्त घोषणापत्र सादर करण्यास सांगितले, जेणेकरून शोध घेता येईल. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या मसुदा आणि अंतिम मतदार यादीवर काँग्रेसने आक्षेप नोंदवलेला नाही.
राहुल यांचा दावा : या पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’
पाच प्रकारच्या मतचोरीचे उदाहरण म्हणून बंगळुरू मध्य मतदारसंघातील महादेवपूर विधानसभा मतदारसंघाचे विश्लेषण राहुल गांधी यांनी सादर केले.
बनावट मतदार ११,९६५
खोटे/अवैध पत्ते ४०,००९
एकाच पत्त्यावर
अनेक मतदार १०,४५२
अवैध फोटो ४,१३२
फॉर्म ६चा गैरवापर ३३,६९२
एकूण ‘व्होट चोरी’ १,००,२५०
मला वाटते मतांची चोरी महाराष्ट्रात किंवा भारतातही झालेली नाही. काही चोरीला गेलेच असेल तर राहुल गांधींच्या डोक्याची चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे. त्यामुळे त्याच त्याच गोष्टी रोज बोलतात. ते खोटे बोलतात व पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात. मागच्या वेळी सांगितले महाराष्ट्रात ७५ लाख मतदार वाढले. आता सांगितले एक कोटी मतदार वाढले. दरवेळी काहीतरी नवे सांगून सनसनाटी आरोप करण्याचा प्रयत्न करतात.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
काय म्हणतो कर्नाटक आयोग? : राहुल यांना खरोखरच आपले दावे खरे असल्याचे सिद्ध करायचे असतील तर त्यांनी शपथपत्र सादर करून त्यांना खोट्या वाटणाऱ्या मतदारांची यादी द्यावी .
राहुल गांधींचे प्रश्न
प्रस्थापित सरकारविरोधी लाटेचा भाजपवर परिणाम होत नाही, मात्र इतर पक्षांच्या सरकारांवर होतो याचे कारण काय?
पूर्वी अद्यावत तंत्रज्ञान नव्हते तरी एका दिवसात मतदान आटोपायचे. आता एका दिवसात का होत नाही? अनेक टप्पे का चालतात?
आयोग इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही? यंत्राद्वारे वाचता येणार नाहीत अशा मतदार याद्या का पुरवल्या जातात? सीसीटीव्ही फुटेज का देत नाही?
दरम्यान, राहुल गांधी यांनी शुक्रवार, दि. ८ ऑगस्टला बंगळुरूत मोर्चाचे आयोजन केले आहे.