हिमाचलमध्ये मोठा गोंधळ: दिल्ली पोलिसांचे 20 जवान हिमाचल पोलिसांच्या ताब्यात, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 20:02 IST2026-02-25T19:55:16+5:302026-02-25T20:02:30+5:30
दिल्ली पोलिसांची कारवाई स्वतःवरच उलटली!

हिमाचलमध्ये मोठा गोंधळ: दिल्ली पोलिसांचे 20 जवान हिमाचल पोलिसांच्या ताब्यात, कारण काय..?
नवी दिल्ली येथे आयोजित AI समिटमध्ये गोंधळ घालणाऱ्या युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या दिल्लीपोलिसांच्या 20 जवानांना हिमाचल पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार चंदीगड-कालका-शिमला राष्ट्रीय महामार्गावर घडला.
AI समिटमधील आंदोलनातून प्रकरणाची सुरुवात
या घटनेचा संबंध दिल्लीमध्ये आयोजित AI समिटशी आहे. या परिषदेदरम्यान काही युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शर्टलेस आंदोलन केले. आंदोलनानंतर तीन कार्यकर्ते हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रोहडू परिसरातील एका हॉटेलमध्ये लपून बसले. दिल्ली पोलिसांना त्यांच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर एक विशेष पथक रोहडूकडे रवाना झाले. तेथून तिघांनाही ताब्यात घेऊन दिल्लीला नेत असताना हा वाद उद्भवला.
सोलन पोलिसांची नाकाबंदी, 20 जवान ताब्यात...
दिल्ली पोलिसांच्या या कारवाईची माहिती मिळताच सोलन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. धर्मपूरजवळ महामार्गावर नाकाबंदी करत दिल्ली पोलिसांच्या वाहनांना थांबवण्यात आले. याच ठिकाणी दिल्ली पोलिसांचे 20 जवान ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला.
शिमला न्यायालयात कार्यकर्त्यांना हजर
ताब्यात घेतलेल्या तीन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना शिमला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारीही न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. विरोधी पक्षांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, ही राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचा आरोप केला आहे.