पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. यातच सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी राजस्थानातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
महत्वाचे म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला. याच दरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले होते.
माध्यमांती सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थान फ्रंटियरच्या बीएसएफ यूनिटने या पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, तो भारतीय सीमेत कसा आला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
महत्वाचे म्हणजे, गेल्या २३ एप्रिलला पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले होते आणि भारतीय जवानांनी तीव्र विरोध करूनही त्यांनी बीएसएफ जवानाला सोपवण्यास नकार दिला होता.
हा मुद्दा भारताने गांभीर्याने घेतला असून पाकिस्तानी रेंजर्सना पूर्णम कुमार यांना तत्काळ सोडण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप, यासंदर्भात पाकिस्तानकडून कुठल्याही प्रकारची सकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही.
दोन्ही पक्षांत सुमारे ४-५ फ्लॅग मिटिंग झाल्या, पण... -२४ व्या बटालियनचे कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांना २३ एप्रिल रोजी पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले आहे. पूर्णम यांच्याकडून चुकून फिरोजपूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली गेली होती. बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सना एक विरोध पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र त्यांनी अद्याप, जवान कोठे आहे आणि त्याच्या परतीच्या तारखेसंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही.
दोन्ही पक्षांत सुमारे ४-५ फ्लॅग मिटिंग झाल्या आहेत. मात्र, पूर्णम यांच्या परतीसंदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. बीएसएफने रेंजर्सच्या सेक्टर कमांडरला विरोध पत्र पाठवले आहे. मात्र पाक रेंजर्सनी मौन बाळगले आहे. त्यांच्याकडून ना कोणते विरोध पत्र जारी करण्यात आले आहे, ना बीएसएफ जवानाच्या प्रकृतीसंदर्भात काही माहिती देण्यात आली आहे.