आम आदमी पार्टी आणि पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. राज्यसभेतील 'आप'च्या उपनेतेपदावरून हटवण्यात आल्यानंतर, राघव चड्ढा यांनी एक व्हिडीओ जारी करून स्वतःच्याच पक्षावर निशाणा साधला. याला प्रत्युत्तर म्हणून 'आप' नेत्यांनीही आपल्याच खासदारावर हल्लाबोल केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राघव चड्ढा हे 'कॉम्प्रोमाइज्ड' (मुल्यांशी तडजोड केलेले) झाले असल्याचं म्हटलं आहे.
भगवंत मान म्हणाले की, पक्षामध्ये संसदीय मंडळाचे नेते वेळोवेळी बदलले जातात आणि ही एक सामान्य प्रक्रिया आहे. स्वतःचं उदाहरण देताना ते म्हणाले की, २०१४ ते २०१९ दरम्यान त्यांनीही डॉक्टर धर्मवीर गांधी यांची जागा घेतली होती. मान पुढे म्हणाले की, अनेक गंभीर मुद्द्यांवर पक्षाची अशी अपेक्षा असते की खासदारांनी वॉकआउट करावा किंवा आपला आवाज उठवावा.
"जेव्हा एखादा खासदार असं करत नाही, तेव्हा ते 'व्हिप'चे उल्लंघन ठरतं आणि अशा उल्लंघनावर कारवाई केली जाते. पश्चिम बंगालमधील मतदारांची नावं चुकीच्या पद्धतीने हटवण्याचं प्रकरण असो किंवा गुजरातमधील 'आप' कार्यकर्त्यांच्या अटकेचं... राघव चड्ढा यांनी या गंभीर विषयांवर बोलण्याऐवजी संसदेच्या कॅन्टीनमधील समोसे महाग होणं आणि पिझ्झा डिलिव्हरीला होणारा उशीर असे मुद्दे उपस्थित केले. मला वाटतं की ते 'कॉम्प्रोमाइज्ड' झाले आहेत" असं म्हटलं.
आतिशी यांचे गंभीर आरोप
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी म्हटलं आहे की, "राघव चड्ढा हे पंतप्रधान मोदींच्या मांडीवर जाऊन बसले आहेत." राघव चड्ढा हे कोणत्याही मुद्द्यावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलण्यास घाबरतात, असा आरोपही त्यांनी केला. आतिशी म्हणाल्या की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी तृणमूल काँग्रेसने (TMC) आणलेल्या महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास राघव यांनी नकार दिला. जेव्हा संपूर्ण विरोधकांनी सभात्याग केला, तेव्हा ते सभागृहातच बसून राहिले.
"पंतप्रधानांशी भिडण्याची वेळ आली, तेव्हा मागे हटले"
त्यांनी असा दावा केला की, राघव चड्ढा यांनी संसदेत एलपीजी (गॅस) संकटाचा मुद्दा मांडण्यासही नकार दिला होता. एका प्रश्नाला उत्तर देताना आतिशी म्हणाल्या, "पक्षाने त्यांना 'बेनिफिट ऑफ डाऊट' दिला होता. आम्हाला वाटलं होतं की कदाचित त्यांच्या डोळ्यांच्या समस्येमुळे ते मागे हटत असावेत, भीतीमुळे नाही. मात्र, जेव्हा जेव्हा पंतप्रधानांशी भिडण्याची वेळ आली, तेव्हा राघव मागे हटले. जर त्यांना सामान्य माणसाची काळजी असती, तर त्यांनी एलपीजी संकटावर नक्कीच भाष्य केलं असतं."
Web Summary : AAP leaders criticize Raghav Chadha after his removal from a party post. Bhagwant Mann accuses him of being 'compromised,' prioritizing trivial issues. Atishi alleges Chadha avoids confronting Modi, siding with the opposition.
Web Summary : आप नेता राघव चड्ढा को पद से हटाने के बाद उनकी आलोचना कर रहे हैं। भगवंत मान ने उन पर 'समझौता' करने और महत्वहीन मुद्दों को प्राथमिकता देने का आरोप लगाया। आतिशी ने आरोप लगाया कि चड्ढा मोदी का विरोध करने से बचते हैं।