"आई, मंदिरात जातोय..." मुलाचा ठरला शेवटचा संवाद ; बंगळुरूमध्ये कार अपघात ५ मित्रांचा अंत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 19:55 IST2026-02-15T19:43:44+5:302026-02-15T19:55:54+5:30
बंगळुरुमध्ये झालेल्या कार अपघातात पाच मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

"आई, मंदिरात जातोय..." मुलाचा ठरला शेवटचा संवाद ; बंगळुरूमध्ये कार अपघात ५ मित्रांचा अंत!
Bengaluru Car Accident: शनिवारी रात्री बंगळुरूच्या उत्तर भागात एका कारचा हृदयद्रावक अपघात घडला. एका वेगवान टाटा इंडिका कारने केएसआरटीसी बसला दिलेल्या जोरदार धडकेत पाच तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भरधाव कारचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा इंडिका कार अत्यंत वेगात होती. भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार प्रथम दुभाजकाला धडकली. धडक इतकी जोरात होती की कार हवेत उडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये शिरली आणि समोरून येणाऱ्या केएसआरटीसी बसवर जाऊन आदळली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
पाच मित्रांचा मृत्यू
कारमधील पाच प्रवाशांपैकी चार तरुणांचा (वय १७ ते २२ वर्षे) जागीच मृत्यू झाला. पाचव्या प्रवाशाला गंभीर अवस्थेत तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. सुदैवाने, बसमधील सर्व ४३ प्रवासी सुरक्षित असून त्यांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले आहे.
मद्यप्राशनाचा संशय; पोलिसांकडून तपास सुरू
बेंगळुरूचे सह पोलीस आयुक्त कार्तिक रेड्डी यांनी सांगितले की, "अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. कारमधील तरुणांनी मद्यप्राशन केले होते का, याची पडताळणी करण्यासाठी रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत." तसेच मृत तरुणांच्या पार्श्वभूमीचीही चौकशी केली जात आहे.
"आई, मंदिरात जातोय..."; ठरला शेवटचा संवाद
या अपघातातील एका मृत तरुणाच्या आईने माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. "माझा मुलगा सीसीटीव्ही ऑपरेटर म्हणून काम करत होता. तो मंदिरात जात असल्याचे सांगून घरून निघाला होता आणि उशीर होईल असेही म्हणाला होता. ते सर्व मित्र होते, पण ती कार कोणाची होती हे मला माहित नाही," असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.