भारताने पुढे केला मैत्रीचा हात; बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना दिल्ली दौऱ्याचे आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 20:41 IST2026-02-17T20:40:58+5:302026-02-17T20:41:58+5:30
Bangladesh Tarique Rahman: मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचा कार्यकाळ संपुष्टात.

भारताने पुढे केला मैत्रीचा हात; बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना दिल्ली दौऱ्याचे आमंत्रण
Bangladesh Tarique Rahman: बांग्लादेशात राजकीय सत्तांतरानंतर आज अखेर तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधीसह मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचा 18 महिन्यांचा कार्यकाळ समाप्त झाला. या संपूर्ण काळात देशात राजकीय अनिश्चितता आणि अस्थिरतेचे वातावरण होते. मात्र, आता नवीन सरकारकडून स्थैर्याची अपेक्षा केली जात आहे.
ओम बिर्लांनी घेतली तारिक रहमान यांची भेट
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी (17 फेब्रुवारी) बांग्लादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक अभिनंदनपत्र तारिक रहमान यांच्याकडे सुपूर्द केले. ओम बिर्ला हे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्यासह भारत सरकारच्या वतीने रहमान यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. या दौऱ्यात त्यांनी मालदीवचे राष्ट्रपती, भूतानचे पंतप्रधान तसेच इतर देशांच्या नेत्यांशीही चर्चा केली.
Just concluded a constructive meeting with Prime Minister of Bangladesh @trahmanbnp
— Om Birla (@ombirlakota) February 17, 2026
I handed over a personal letter from Prime Minister @narendramodi conveying his wishes to PM Rahman and inviting him to visit India at the earliest convenience.
I extended warm congratulations… pic.twitter.com/gFNqLmnxsT
तारिक रहमान यांना भारत दौऱ्याचे आमंत्रण
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘X’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत सांगितले की, बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्याशी अत्यंत सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक पत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले असून, त्यात लवकरात लवकर भारत दौऱ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. भारताच्या वतीने मी तारिक रहमान यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि भारत-बांग्लादेशमधील दीर्घकालीन भागीदारी अधिक बळकट करण्याची आमची कटिबद्धता व्यक्त केली.
दरम्यान, भारतामधील बांग्लादेशचे उच्चायुक्त रियाज हामिदुल्लाह यांनीही सांगितले की, दोन्ही देशांनी जनतेच्या कल्याणासाठी जन-केंद्रित सहकार्य धोरणांवर एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.