"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:35 IST2025-05-15T13:35:10+5:302025-05-15T13:35:59+5:30
शिवमंदिरात दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं आहे.

"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
बदायूंमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. शिवमंदिरात दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं आहे. "आम्ही कायदेशीररित्या लग्न करू शकत नसलो तरी, आता आम्ही आयुष्यभर पती-पत्नी म्हणून एकत्र राहू. आम्ही पुरुषांचा तिरस्कार करतो म्हणूनच आम्ही हे पाऊल उचलत आहोत" असं तरुणींनी म्हटलं आहे. बदायूं येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ही घटना घडली.
दोन तरुणी वकील दिवाकर वर्मा यांच्या चेंबरमध्ये पोहोचल्या. त्यांनी एकमेकींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही मैत्रिणी आहोत आणि जवळजवळ ३ महिन्यांपासून एकत्र राहत आहोत. आम्हाला दोघींनाही आयुष्यभर पती-पत्नी म्हणून एकत्र राहायचं आहे असं सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिव मंदिरात दोन्ही मुलींनी एकमेकींना हार घालून लग्न केलं आहे.
"आम्ही पुरुषांचा तिरस्कार करतो"
लग्न करणाऱ्या तरुणी म्हणतात की, आम्ही पुरुष समाजाचा तिरस्कार करतो आणि आम्हाला एकमेकींसोबत आयुष्य घालवायचं आहे. कायद्याने लग्न करण्याची परवानगी दिली नसली तरी मंदिराच्या आवारात लग्न केलं आहे. कुटुंबातील सदस्यांनी आमच्याशी नातं ठेवलं नाही तरी काही हरकत नाही. आम्ही दोघीही आयुष्यभर एकमेकींना आधार देत राहू. हिंदू असल्याचं भासवून मुस्लिम तरुणांनी दोघींनाही फसवलं. म्हणूनच आम्ही पुरुषांचा तिरस्कार करतो. आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला आहे.
वकिलांनी काय म्हटलं?
वकील दिवाकर वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही मुली माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की आम्हाला लग्न करायचं आहे. आम्ही पुरुषांचा खूप तिरस्कार करतो. पुरुषांनी आम्हाला खूपच त्रास दिला आहे. दोन्ही मुलींना हिंदू असल्याचं भासवून मुस्लिम पुरुषांनी फसवलं. त्यांनी याबद्दल पोलिसांकडे तक्रारही केली, पण त्यांना न्याय मिळाला नाही. मंदिरात आता त्यांचं लग्न झालं आहे.