दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:36 IST2025-05-21T09:30:16+5:302025-05-21T09:36:15+5:30
Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताविरोधात कारवाया करणाऱ्याच्या कटात सामील असलेल्या आणि पाकला संवेदनशील माहिती पाठवणाऱ्या अनेकांची धरपकड सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्र सरकारने देशातही अनेक कारवाया तीव्र केल्याचे पाहायला मिळत आहे. यातच हरयाणाची ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती दिल्याच्या प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. यातच उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने मुरादाबाद येथून शहजाद नामक व्यक्तीला अटक केली आहे. शहजादची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केल्याचे समजते.
शहजाद याच्याबद्दल गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यावर त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. अखेर त्याला अटक करण्यात आली. शहजाद भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता, असे तपासातून आता समोर येत असल्याचे म्हटले जात आहे. शहजाद तस्करी करताना आयएसआयच्या संपर्कात आला. व्हॉट्सअॅपच्या एन्क्रिप्टेड मेसेजमधून तो त्यांच्याशी संवाद साधत होता. आयएसआय एजंट्सनी शहजादला भारतातून संवेदनशील माहिती पाठविण्यास सांगितले होते. भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट घडवून आणता येतील आणि भारतात अशांतता पसरवता येईल, असा यामागील हेतू होता, अशी माहिती देण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या आयएसआय एजंट्सची थेट मदत घेतली
भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यात शहजाद एकटाच काम करत नव्हता. शहजादने रामपूरमधील अनेक तरुणांना पाकिस्तानात पाठवले होते. तिथे त्या तरुणांना हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या घडामोडींमधील एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या तरुणांसाठी व्हिसाची व्यवस्था शहजादने स्वतः केली होती. या कामासाठी शहजादने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआय एजंट्सची थेट मदत घेतली होती, अशी माहिती एटीएस सूत्रांकडून मिळाल्याचे सांगितले जात आहे.
सामान्य तरुणांना ‘अशा’ पद्धतीने फसवायचा
शहजादने अतिशय हुशारीने रामपूरमधील काही सामान्य तरुणांना त्याच्या नेटवर्कमध्ये सामील करून घेतले होते. सौंदर्यप्रसाधने, बनावट दागिने आणि महिलांच्या कपड्यांच्या तस्करीसारख्या कामांमध्ये त्यांना सहभागी करून तो व्यवसाय कायदेशीर असल्याचे भासवले. हळूहळू त्यांना मानसिकदृष्ट्या तयार केले आणि पाकिस्तानला पाठवण्याची व्यवस्था केली. या तरुणांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. भारतात माहिती आणि पैशांच्या अफरातफरीसाठी त्यांचा वापर करण्यात आला, असा संशय एटीएसला आहे. पाकिस्तानमधून येणारा पैसा भारतात फुटीरतावादी आणि विध्वंसक कारवायांना चालना देण्यासाठी खर्च केला जात होता का, याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, शहजादने या तरुणांना दिलेले व्हिसा नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयामार्फत जारी करण्यात आले होते. शहजाद हा दानिश नावाच्या आयएसआय एजंटच्या संपर्कात होता, जो उच्चायुक्तालयात होता. हाच दानिश व्हिसा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या ज्योती मल्होत्राला पाकिस्तानात पाठवण्याच्या प्रकरणात दानिशचे नाव यापूर्वीही समोर आले होते.