हा भारताचा अपमान, सरकारने यावर..; चीनच्या 'त्या' दाव्यावर असदुद्दीन ओवेसी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:27 IST2026-01-01T16:27:12+5:302026-01-01T16:27:47+5:30

Asaduddin Owaisi: भारत-पाकिस्तान संघर्षात आपण मध्यस्थी केल्याचा दावा चीनने केला आहे.

Asaduddin Owaisi: This is an insult to India, the government..; Asaduddin Owaisi spoke clearly on China's 'that' claim | हा भारताचा अपमान, सरकारने यावर..; चीनच्या 'त्या' दाव्यावर असदुद्दीन ओवेसी स्पष्टच बोलले

हा भारताचा अपमान, सरकारने यावर..; चीनच्या 'त्या' दाव्यावर असदुद्दीन ओवेसी स्पष्टच बोलले

Asaduddin Owaisi: भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धविराम (सीजफायर) प्रक्रियेत चीनने मध्यस्थी केल्याच्या दाव्यावर राजकीय वाद पेटला आहे. या मुद्द्यावर आता एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत मोदी सरकारला जाहीरपणे चीनचा दावा फेटाळण्याची मागणी केली आहे. ओवेसींनी यांनी हा दावा भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

भारत गप्प बसू शकत नाही- ओवेसी

ओवेसी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सलग पोस्ट करत चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सीजफायरबाबत दावे करत असतानाच आता चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही भारत-पाक संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. हा थेट भारताचा अपमान आहे. भारत सरकारने यावर कठोर आणि स्पष्ट उत्तर दिले पाहिजे. चीनसोबत संबंध सुधारण्याच्या नावाखाली भारताचा सन्मान आणि सार्वभौमत्व धोक्यात घालता येणार नाही.

भारत-पाकला एकाच पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न

एकीकडे चीन पाकिस्तानला 81% शस्त्रे पुरवतो आणि 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान रिअल-टाइम गुप्त माहिती देतो, आणि दुसरीकडे तो मध्यस्थ असल्याची बतावणी करतो. हे अस्वीकार्य आहे आणि एक देश म्हणून आपण हे शांतपणे सहन करू शकत नाही. चीन भारत आणि पाकिस्तानला एकाच स्तरावर ठेवू इच्छितो आणि स्वतःला दक्षिण आशियातील वर्चस्वशाली शक्ती म्हणून सादर करू पाहतो. पंतप्रधान चीन दौऱ्यावर गेले होते, तेव्हा सरकारने अशा भूमिकेला संमती दिली होती का? असा सवालही ओवेसींनी यावेळी विचारला.

केंद्र सरकारकडून चीनच्या दाव्याचे खंडन

दरम्यान, बुधवारी (31 डिसेंबर 2025) केंद्र सरकारने चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दाव्यांचे अधिकृतपणे खंडन केले. सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले की, भारत-पाक संघर्षात कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीला भारताचा ठाम विरोध आहे आणि या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या अशाच दाव्यांनाही भारताने फेटाळले होते.

चिनी परराष्ट्र मंत्र्यांचा दावा काय होता?

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी एका भाषणात दावा केला होता की, दीर्घकालीन शांततेसाठी चीनने निष्पक्ष आणि न्याय्य भूमिका घेतली. संघर्षाची लक्षणे आणि मूळ कारणे दोन्ही दूर करण्यावर आमचा भर होता. याच भूमिकेमुळे चीनने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी केली.

Web Title : ओवैसी ने भारत-पाक संघर्ष में चीन के मध्यस्थता दावे की निंदा की, सरकार से खंडन की मांग की।

Web Summary : ओवैसी ने भारत और पाकिस्तान के बीच मध्यस्थता के चीन के दावे की आलोचना करते हुए इसे भारत की संप्रभुता का अपमान बताया। उन्होंने सरकार से चीन के दावे का कड़ा खंडन करने और सवाल किया कि क्या भारत ने प्रधानमंत्री की यात्रा के दौरान अपनी स्थिति से समझौता किया।

Web Title : Owaisi slams China's mediation claim in India-Pakistan conflict, demands government rebuttal.

Web Summary : Owaisi criticizes China's claim of mediating between India and Pakistan, calling it an affront to India's sovereignty. He urges the government to strongly refute China's assertion and questions if India compromised its position during the Prime Minister's visit.