"फक्त बिहारमध्येच का?, मोफत लस हा देशातील सर्वच नागरिकांचा हक्क"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 13:20 IST2020-10-25T13:15:54+5:302020-10-25T13:20:29+5:30

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील भाजपाच्या या आश्वासनावरून निशाणा साधला आहे. "फक्त बिहारमध्येच का? मोफत लस हा देशातील सर्वच नागरिकांचा हक्क" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

arvind kejriwal attacks bjp said free covid vaccine is the right of every indian | "फक्त बिहारमध्येच का?, मोफत लस हा देशातील सर्वच नागरिकांचा हक्क"

"फक्त बिहारमध्येच का?, मोफत लस हा देशातील सर्वच नागरिकांचा हक्क"

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जाहीरनाम्यात जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनावरून विरोधकांनी भाजपाला घेरले आहे. भाजपा कोरोनावरील लसीचा राजकीय फायदा उठवू पाहत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील भाजपाच्या या आश्वासनावरून निशाणा साधला आहे. "फक्त बिहारमध्येच का? मोफत लस हा देशातील सर्वच नागरिकांचा हक्क" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी देशभरातील जनता कोरोना संसर्गामुळे प्रभावित झाली आहे, त्यामुळे सगळ्यांनाच मोफत लस उपलब्ध करून दिली पाहिजे असं म्हटलं आहे. "जेव्हा कोरोनावरील लस उपलब्ध होईल, तेव्हा मोफत मिळावी, हा देशातील नागरिकांचा हक्कच आहे" असं ते म्हणाले. केंद्राकडून अत्यावश्यक गटासाठी थेट लस उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य आणि जिल्हा यंत्रणेना केंद्राकडून ही लस थेट खरेदी करता येईल, त्यानंतर ती अत्यावश्यक गटांना उपलब्ध करून देता येईल असंही म्हटलं आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी केंद्राला लक्ष्य केले. बिगरभाजपाशासित राज्यांचे काय? ज्या भारतीयांनी भाजपाला मतदान केले नाही, त्यांनी कोरोनावरील मोफत लस मिळणार नाही का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला होता. केंद्र सरकारने नुकतीच कोविड लसीबाबत धोरण आखले आहे. तुमच्या राज्यात विधानसभा निवडणुका कधी आहेत, त्यानुसार तुम्हाला कोरोनावरील लस कधी मिळेल, हे तुम्हाला समजेल, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली आहे.

कोरोनावरील लशीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल. भाजपाच्या जाहीरनाम्यातील हे पहिले वचन आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीतारामन यांनी ही घोषणा केल्यानंतर लगेचच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीही तमिळनाडूच्या जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिलं आहे. 

Web Title: arvind kejriwal attacks bjp said free covid vaccine is the right of every indian