पाक सीमेवर आता बंकर्सच्या वस्त्या; ९० हजार बंकर तयार, तेवढेच नवे होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:47 IST2025-05-31T12:46:40+5:302025-05-31T12:47:11+5:30

पाकिस्तानच्या वाढत्या कारवायांचा अंदाज घेत केंद्र सरकारचा निर्णय; केंद्रीय गृहमंत्र्यांची घोषणा

Anticipating Pakistan activities the central government has decided to double the number of bunkers on the borders | पाक सीमेवर आता बंकर्सच्या वस्त्या; ९० हजार बंकर तयार, तेवढेच नवे होणार

पाक सीमेवर आता बंकर्सच्या वस्त्या; ९० हजार बंकर तयार, तेवढेच नवे होणार

सुरेश एस. डुग्गर 

जम्मू : पाकिस्तानला लागून असलेल्या ८१४ किमी लांब प्रत्यक्ष नियंत्रणरेषा (एलओसी) आणि २६४ किमी लांब आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर आता बंकरांच्या वस्त्या बघायला मिळतील. केंद्र सरकारने पाकिस्तानच्या कारवायांचा अंदाज घेत सीमांवरील बंकरांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी पुंछमध्ये आयोजित सभेत तशी घोषणा केली आहे.

ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने जोरदार गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू केला. या हल्ल्यांत २१ नागरिकांचा मृत्यू झाला आणि शेकडो घरे उद्ध्वस्त झाली. जम्मू शहरालाही ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ल्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे सर्वत्र बंकर उभारण्याची मागणी जोर धरू लागली. आतापर्यंत सुमारे ९० हजार बंकर बांधले गेले असून आता ही संख्या दुप्पट केली जाणार आहे. सीमेवरील या धोकादायक ठिकाणी जीवन आता बंकरांभोवती फिरते. घराबाहेर काम करणारे लोकही बंकरांच्या जवळच काम करतात. आकाशात धूर दिसला की, बंकरकडे धाव घ्यायची सवय लागली आहे. हा धूर म्हणजे पाकिस्तानी तोफांनी उडवलेले गोळे असतात.

कारगिल युद्धात बंकरच होते घर

कारगिल युद्धादरम्यान, कारगिल हा पहिला असा भाग ठरला जेथे लोकांनी घरात नव्हे तर बंकरमध्ये वास्तव्य केले. कष्टाने उभारलेली घरे सोडून लोकांनी खड्ड्यांत व दगडाच्या भिंतींआड रात्री जागून काढल्या. त्यानंतर कारगिलसह सीमेलगतच्या अनेक गावांमध्ये बहुतेक घरांच्या ओसऱ्यांत बंकर बांधले गेले. एलओसीवर १९४७ पासूनच अशांतता आहे. परंतु बंकर्सच्या अभावामुळे सीमावासीयांना प्राण गमावावे लागत होते.

चीन सीमेवर भारताने सैन्य वाढवले 

पूर्व लडाखमध्ये चीनकडून वारंवार होणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी आणि चीनच्या संभाव्य आगळीकीला सडेतोड उत्तर देण्यासाठी सरकारने चीन सीमेलगत आणखी एक लष्करी तुकडी तैनात करण्याचा निर्णय घेतला. ही तुकडी भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनातीसाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. "७२ इन्फन्ट्री डिव्हिजन' असे या नव्या तुकडीचे नाव असेल.

हल्ल्यात घर उद्ध्वस्त; भरपाई दिली ६५०० रुपये 

पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात घराचे छत कोसळले. मोठे नुकसान झाले. तरीदेखील सरकारने नुकसानभरपाई म्हणून केवळ ६५०० रुपयांचा धनादेश माथी मारला, असा आरोप सीमेवरील गावांतील नागरिकांनी केला. जम्मूच्या रिहाडी परिसरातील नागरिकांची ही तक्रार आहे. ही नुकसानभरपाई नव्हे, तर एक क्रूर विनोद आहे, या शब्दांत लोकांनी संताप व्यक्त केला आहे. नीरज किरकोळ जखमींना १० हजार रुपये देण्यात आलेत.

बीएसएफच्या जवानांचा लवकरच नवा गणवेश 

सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या जवानांचा पोशाख लवकरच बदलला जाणार आहे. हे जवान आता डिजिटल पॅटर्नच्या कॉम्बॅट पोशाखात दिसतील. नव्या पोशाखात ५० टक्के खाकी, ४५ टक्के हिरवा आणि पाच टक्के तपकिरी रंग असेल. पोशाख बदलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पुढील एका वर्षात बीएसएफचे सगळे जवान नव्या पोशाखात दिसतील.

नवीन पोशाखाचे कापड आरामदायक तर आहेच पण अत्यंत मजबूत आणि टिकाऊदेखील असेल. आधीच्या कॉम्बॅट पोशाखात ५० टक्के कॉटन आणि ५० टक्के पॉलिस्टर असे मिश्रण होते. आता ८० टक्के कॉटन, १९ टक्के पॉलिस्टर आणि एक टक्का स्पेंडेक्स असे प्रमाण असेल. हे कापड गरजेनुसार लांब होऊ शकेल.

कुठे केले डिझाइन?

हा पोशाख बीएसएफच्या कारागिरांनी इन हाउस डिझाइन केला आहे. यासाठी अधिकारी दीड वर्षापासून मेहनत घेत आहे. बीएसएफने डिजिटल प्रिंटचे पेटेंटदेखील मिळवले आहे.
 

Web Title: Anticipating Pakistan activities the central government has decided to double the number of bunkers on the borders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.