आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या असणार, जगनमोहन रेड्डींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 12:01 IST2019-12-18T11:56:30+5:302019-12-18T12:01:00+5:30

तीन राजधान्यांबाबत विचार करण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती गठित

Andhra Pradesh may have three capitals borne out of decentralisation: CM Jagan Mohan Reddy | आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या असणार, जगनमोहन रेड्डींची घोषणा

आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या असणार, जगनमोहन रेड्डींची घोषणा

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशात आता तीन राजधान्या असणार आहेत. याबाबतची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी विधानसभेत केली. आता आंध्र प्रदेशातील राजधान्यांमध्ये करनूल, विशाखापट्टनम आणि अमरावतीचा समावेश आहे. सध्या हैदराबाद हीच सध्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांची राजधानी आहे. परंतु आता आंध्र प्रदेशने स्वतःची वेगळी राजधानी निर्माण करण्याचे म्हटले आहे. 

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, आंध्र प्रदेश राज्याच्या तीन राजधान्या असतील. या वेगवेगळ्या राजधान्यामधून सरकार, विधानसभा आणि न्याय प्रक्रियेचे कामकाज केले जाणार आहे. म्हणजेच विशाखापट्टनम् आंध्रप्रदेशची प्रशासकीय कार्यकारी (executive) राजधानी असणार आहे. करनूलला न्यायिक (judicial) राजधानी म्हणून ओळख मिळणार आहे. तर, अमरावती विधिमंडळ (lagislative ) राजधानी म्हणून ओळखली जाणार आहे. 

राज्याच्या तीन राजधान्या असाव्यात, असा आमचा विचार आहे. त्याची आम्हाला आवश्यकता वाटते. यावर आम्ही गंभीरतेने विचार करत आहोत. यासाठी तीन राजधान्यांबाबत विचार करण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे यावेळी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले. याशिवाय, सचिवालय आणि विभागीय कार्यालये  लवकरच विशाखापट्टणममध्ये स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिले आहेत. 
 

Web Title: Andhra Pradesh may have three capitals borne out of decentralisation: CM Jagan Mohan Reddy