Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 14:39 IST2026-04-10T14:37:56+5:302026-04-10T14:39:23+5:30
3 Minor Girls Drown In Waterfall: निसर्गाच्या सानिध्यात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या काही मैत्रिणींवर काळाने घाला घातला.

Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
निसर्गाच्या सानिध्यात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या काही मैत्रिणींवर काळाने घाला घातला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात तीन अल्पवयीन मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अनंतगिरी टेकड्यांमधील मुलागुम्मी गावातील एका धबधब्यावर ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुकूमपेटा मंडलातील मुलागुम्मी गावाजवळ असलेल्या निसर्गरम्य धबधब्याचा आनंद घेण्यासाठी काही मुली आल्या होत्या. गुरुवारी दुपारी या मुली धबधब्याजवळ अंघोळीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी एक मुलगी पाण्यात बुडाली. त्यावेळी एक मुलगी पाण्यात बुडाली आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतरही दोन मुलीही वाहून गेल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने तिघीही पाण्यात बुडू लागल्या. मुली पाण्यात पडल्याचे पाहून काही स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. मात्र, त्यांना वाचवण्यात नागरिकांना अपयश आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या मुलींची ओळख पटली असून, त्या सर्व जवळच्या गावातील रहिवासी होत्या. तृषा (वय, १७ वर्षे), रत्नकुमारी (वय १६ वर्षे) आणि पवित्रा (वय १६ वर्षे) अशी मृत मुलींची नावे आहेत. दरम्यान, नागरिकांनी धबधबे आणि नद्यांच्या ठिकाणी निसरड्या खडकांवर जाणे टाळावे, केवळ एक सेल्फी किंवा फोटोसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.