अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:44 IST2025-06-23T14:42:03+5:302025-06-23T14:44:24+5:30
सुरक्षेला प्राधान्य देत पायलटने तात्काळ हे विमान रनवेवरून पुन्हा पार्किंगच्या परिसरात आणले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले

अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
चंदीगड - अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अनेकांच्या मनात विमान प्रवासाबद्दल धडकी भरली आहे. अलीकडेच चंदीगडच्या शहीद भगत सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. याठिकाणी लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात टेकऑफ होण्याआधीच तांत्रिक बिघाड लक्षात आला. पायलटच्या सतर्कतेमुळे विमान उड्डाण वेळीच रोखले आणि विमानातील १७७ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बोर्डिंगनंतर विमानाचे उड्डाण रद्द केल्याने प्रवाशांमध्ये मोठी नाराजी पसरल्याचे दिसून आले.
जवळपास १ तास विमान उड्डाण खोळंबले तरीही प्रवाशांना योग्य ती माहिती दिली नाही. ही फ्लाईट सकाळी 7.10 मिनिटांनी रवाना होणार होती. सर्व प्रवासी बोर्डिंग करून विमानात बसले होते. विमान हळूहळू पार्किंग एरियातून रनवेच्या दिशेने जात होते तेव्हा पायलटला विमानातील तांत्रिक बिघाड लक्षात आला. सुरक्षेला प्राधान्य देत पायलटने तात्काळ हे विमान रनवेवरून पुन्हा पार्किंगच्या परिसरात आणले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर फ्लाईट अचानक रद्द करण्यात आली. प्रवाशांनाही १ तास कुठलीही माहिती न दिल्याने विमानतळावरच गोंधळ उडाला.
IndiGo Flight 6E 146 from Chandigarh to Lucknow was cancelled after the Pilot detected a technical issue
— ANI (@ANI) June 22, 2025
An IndiGo flight scheduled to depart from Chandigarh to Lucknow was cancelled on Friday after the pilot identified a technical issue during pre-flight checks. The problem was…
या प्रकारामुळे लहान मुले, वृद्ध प्रवासी, महिला त्रस्त असल्याचे दिसून आले. काही प्रवासी जमिनीवर बसूनच पुढच्या सूचनेची वाट पाहत होते. एका प्रवाशाने सोशल मीडियावर त्याची व्यथा मांडत पंतप्रधान कार्यालयाकडे मदतीची मागणी केली. बोर्डिंग झाल्यानंतर विमानाचे उड्डाण रद्द होणे हे केवळ गैरसोयीचेच नाही तर मानसिक ताण देखील वाढवते. बोर्डिंगनंतर उड्डाण रद्द केले परंतु कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने समोर येऊन वस्तूस्थितीची माहिती दिली नाही. १ तासाहून अधिक वेळ झाला तरीही कुणी काही सांगण्यास तयार नाही असं प्रवाशाने सांगितले.
दरम्यान, फ्लाईट रद्द झाल्यानंतर इंडिगोने प्रवाशांना अन्य विमान सेवेचा पर्याय दिला. ज्या प्रवाशांना पुन्हा प्रवास करायचा नाही त्यांना पूर्ण रिफंड देण्याचाही पर्याय दिला. काही प्रवाशांना दिल्लीतून लखनौला जाणारी कनेक्टिंग फ्लाईटची सुविधा दिली. काही प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दुसरीकडे लखनौ येथील चौधरी शरण सिंह एअरपोर्टहून दिल्लीला येणाऱ्या जाणाऱ्या २५ फ्लाईट एअर इंडियाने रद्द केल्या. २१ जून ते १५ जुलैपर्यंत या फ्लाईट रद्द आहेत.