पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:20 IST2025-06-22T19:19:40+5:302025-06-22T19:20:41+5:30

Amit Shah on Naxalite : 'नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत. आत्मसमर्पण करण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही.'

Amit Shah on Naxalite: Surrender, otherwise...Anti-Naxal campaign will continue even in monsoon; Amit Shah's ultimatum | पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

Amit Shah on Naxalite : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातून नक्षलवादाचा खात्मा करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत चा अल्टीमेटम दिला आहे. या दिशेने नक्षलग्रस्त भागात तीव्र मोहिमा राबवल्या जात आहेत. दरम्यान, आता गृहमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. छत्तीसगडमधील एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले की, देशातून नक्षलवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करणे, हे सरकारचे ध्येय आहे. या दिशेने केंद्र आणि राज्य सरकार वेगाने काम करत आहे.

पावसाळ्यातही मोहिमा सुरू राहणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पूर्वी नक्षलवादी पावसाचा फायदा घेऊन जंगलात लपून बसायचे, परंतु आता असे होणार नाही. नक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही. नक्षलवादाविरुद्धची कारवाई पावसातही सुरुच राहील. ही कारवाई कोणत्याही हवामानावर अवलंबून राहणार नाही. आमचे सुरक्षा दल पूर्ण ताकदीने काम करत आहेत आणि ही लढाई निर्णायक वळणावर पोहोचली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत. आत्मसमर्पण करण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. 

हिंसेचा मार्ग सोडून द्या...
गृहमंत्र्यांनी छत्तीसगड सरकारच्या नवीन नक्षलवादी आत्मसमर्पण धोरणाचे कौतुक केले आणि सांगितले की, हा एक सकारात्मक पुढाकार आहे, ज्यामुळे मुख्य प्रवाहात परतणाऱ्यांना चांगले भविष्य आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी मिळेल. त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून देशाच्या विकास प्रवासात भागीदार होण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "विकसित भारत" च्या दृष्टिकोनाचा उल्लेख केला आणि सांगितले की, हे स्वप्न केवळ पायाभूत सुविधा, नवोपक्रम आणि आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही, तर ते वेळेवर न्याय आणि सामाजिक स्थिरतेवर देखील लक्ष केंद्रित करते. नक्षलवादसारख्या समस्यांपासून भारताला मुक्त करूनच खरा विकास सुनिश्चित करता येईल.

नक्षलवादाचे समूळ उच्चाटन केले जाईल
गेल्या काही वर्षांत नक्षलग्रस्त भागात पोलिस दल तैनात करणे, रस्ते आणि दळणवळणाचे जाळे वाढवणे आणि स्थानिक लोकांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवण्याचे व्यापक काम करण्यात आले आहे. यामुळे नक्षलवाद्यांचा आधार कमकुवत झाला असून, अनेक भाग त्यांच्यापासून मुक्त झाले आहेत. केंद्र आणि राज्याने या एकत्रितपणे काम करत राहिल्यास नक्षलवादाचे समूळ उच्चाटन नियोजित वेळेपूर्वीच करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Amit Shah on Naxalite: Surrender, otherwise...Anti-Naxal campaign will continue even in monsoon; Amit Shah's ultimatum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.