US-इस्रायलविरुद्ध इराण युद्धामुळे भारतात अलर्ट; गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पाठवलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 15:02 IST2026-03-02T15:01:59+5:302026-03-02T15:02:56+5:30
खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतात रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांमुळे सरकारने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर भागात सरकारकडून निर्बंध लावण्यात आलेत

US-इस्रायलविरुद्ध इराण युद्धामुळे भारतात अलर्ट; गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पाठवलं पत्र
नवी दिल्ली - इराणविरुद्धइस्रायलअमेरिका यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. अमेरिकाइस्रायल तेहरानसह अनेक बड्या शहरात सातत्याने बॉम्ब हल्ले करत आहे. तेहरानमध्ये सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यामुळे इराण बदला घेण्याच्या मानसिकतेत आहे. इराणने इस्रायलसह ९ देशांना टार्गेट बनवले आहे. इराणशिवाय अन्य देशातही खामेनेई यांच्या मृत्यूविरोधात प्रदर्शने सुरू आहेत. त्यात भारत सरकारच्या गृह मंत्रालयानेही सर्व राज्यांना पत्र लिहून अलर्ट केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, इराणवर अमेरिका आणि इस्रायल हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात संभाव्य हिंसाचारापूर्वी सतर्क राहा. २८ फेब्रुवारीला हे पत्र प्रसारित केले होते. ज्यात राज्यांना भडकाऊ भाषण देणाऱ्या इराणी कट्टर समर्थकांची ओळख पटवा असं सांगितले होते. या पत्रात मध्य पूर्व आशियात सुरू असणाऱ्या युद्धानंतर भारतातील अनेक भागात होणाऱ्या विरोध प्रदर्शनाबाबत सतर्क केले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाबाबतही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
अमेरिकेशी चर्चा करण्यास इराणचा नकार
इराण यापुढे अमेरिकेशी चर्चा करण्यास तयार नाही असं इराणी अधिकाऱ्याने म्हटल्याचे पीटीआयने सूत्राच्या हवाल्याने बातमी दिली. इराणच्या नवीन नेतृत्वाशी बोलण्यास तयार आहेत असं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी संकेत दिले होते. मात्र इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी 'एक्स' वर कडक इशारा दिला. 'आम्ही अमेरिकेशी वाटाघाटी करणार नाही. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इस्रायलने रविवारी इराणमधील अनेक ठिकाणी जोरदार हल्ले केले. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळांवर बॉम्बहल्ला केला आणि युद्धनौका देखील उद्ध्वस्त केल्या असं सांगितले आहे.
दरम्यान, खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतात रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांमुळे सरकारने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर भागात सरकारकडून निर्बंध लावण्यात आलेत. ज्या भागात लोकांनी उतरून खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल आक्रोश केला त्या लाल चौकातील परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. क्लॉक टॉवरच्या आसपासही सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. सोबतच शाळा आणि कॉलेज पुढील २ दिवस बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील विद्यापीठांच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत.