१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:25 IST2025-06-13T17:21:53+5:302025-06-13T17:25:20+5:30
१० जून रोजी या कुटुंबातील मुलगा भाविक माहेश्वरीचे कोर्ट मॅरेज झाले होते. लग्नाच्या २ दिवसांनीच भाविकचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे

१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
अहमदाबाद - गुजरातच्या भीषण विमान अपघाताने देशाला सुन्न केले आहे. या अपघातातील मृत लोकांची कहाणी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. अहमदाबादच्या विमानतळावरून लंडनसाठी झेपावलेले विमान अवघ्या काही मिनिटांतच मेघानीनगर परिसरात कोसळले आणि भयंकर दुर्घटना घडली. या अपघातात वडोदरा शहर परिसरात राहणाऱ्या माहेश्वरी कुटुंबात अपघाताच्या २ दिवस आधी लग्नसोहळ्याने आनंद होता परंतु या अपघातामुळे हा आनंद काही तासांपुरता मर्यादित राहिला.
१० जून रोजी या कुटुंबातील मुलगा भाविक माहेश्वरीचे कोर्ट मॅरेज झाले होते. लग्नाच्या २ दिवसांनीच भाविकचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भाविक माहेश्वरी मागील अनेक वर्षापासून लंडनला काम करत होता. प्रत्येक वर्षी १५ दिवस सुट्टी काढून तो वडोदरा इथे त्याच्या कुटुंबाला भेटायला यायचा. यावेळीही भाविक भारतात आला. मात्र यंदा लग्न करूनच लंडनला जा असा आग्रह कुटुंबाने धरला. भाविकचा आधीच साखरपुडा झाला होता त्यामुळे कुटुंबाच्या सहमतीने त्याने १० जून रोजी कोर्टात लग्न केले.
लग्नानंतर भाविक पुन्हा कामासाठी लंडनला जाणार होता. त्यामुळे त्याच्या नवविवाहित पत्नी हसत हसत त्याला निरोप दिला. परंतु हा त्याचा अखेरचा निरोप असेल असं कुणालाही वाटले नाही. फ्लाईटमध्ये चढल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचे विमान क्रॅश झाल्याची बातमी कानी आली. याच विमानात भाविक असल्याचं कळताच कुटुंब हादरले. या दुर्घटनेतून कुणीची वाचण्याची शक्यता नव्हती. या अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात भाविकचा मृत्यू झाल्याचं कुटुंब मानायला तयार नाही. वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव नाही. २ दिवसांपूर्वीच लग्नाची मिठाई सर्वांना वाटली आणि आज भयाण शांतता पसरली.
विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू
अहमदाबाद ते लंडनला जाणारे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे केवळ प्रवाशांचा जीव गेला नाही तर त्यांच्या कुटुंबाचे स्वप्न, भविष्य आणि आशाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. कुणी मुलगा, कुणी वडील तर कुणी अख्खं कुटुंबच अपघातात गमावले आहे. या अपघातामुळे ज्यांच्या परतण्याची वाट पाहायची होती ते आता कधीच परतणार नसल्याने कुटुंब शोकाकूळ आहेत. या अपघातात असे लोकही गेले आहेत ज्यांनी पहिल्यांदा विमान प्रवास सुरू करत स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवत लंडनला चालले होते. मात्र हे सर्व अपूर्णच राहिले.