Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:20 IST2025-06-20T14:20:19+5:302025-06-20T14:20:49+5:30
आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आयुष्यभर हे दु:ख आम्हाला छळत राहणार असं रवी यांनी म्हटलं. ही दुर्घटना रवी यांच्या कुटुंबावर मोठा आघात आहे.

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
Ahmedabad Air India Plane Crash: मागील १५ वर्षापासून मेघानीनगरमध्ये राहणाऱ्या रवी ठाकोर आणि त्याचे कुटुंब दररोज सिव्हिल रुग्णालय परिसरात डॉक्टरांना जेवण देण्याचे काम करतात. परंतु १२ जूनला झालेल्या विमान दुर्घटनेची ती कटू आठवण ते आयुष्यात कधीही विसरू शकत नाहीत. एअर इंडिया विमान दुर्घटनेत रवी यांची आई आणि २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. परंतु सुदैवाने रवी यांनी नकळत ८० डॉक्टरांचा जीव वाचवला आहे. काही डॉक्टर दुपारी जेवणासाठी मेसच्या इमारतीत येणार होते परंतु रवी यांनी त्यांना स्वत: हॉस्पिटलमध्ये टिफिन घेऊन पोहचतोय असा निरोप दिला. १ वाजता रवी मेसमधून निघाले आणि हॉस्पिटलला पोहचले. त्यानंतर १ वाजून ४० मिनिटांनी जे घडले त्याने त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला.
रवी यांचे कुटुंब बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल मेसमध्ये डॉक्टरांसाठी जेवण बनवायचे. त्या दिवशी रवी, त्यांची पत्नी ललिता वडील प्रल्हाद ठाकोर आणि एका नातेवाईकांसह टिफिन देण्यासाठी बाहेर पडले. त्यांची २ वर्षाची मुलगी आध्या आई वडिलांच्या मागे लागली परंतु तिला चुकवत ते तिथून बाहेर पडले. प्रचंड उष्णता असल्याने रवी यांनी मुलीसोबत आईलाही मेसच्या इमारतीत ठेवले. जिथे रवी यांची आई किचनमध्ये होती. मुलगी खूप रडत होती, मागे येण्याचा हट्ट करत होती त्यामुळे जेव्हा ती शांत झोपली त्यानंतर रवी आणि त्यांची पत्नी टिफिन देण्यासाठी बाहेर गेले. ही आमची रोजची वेळ होती, मुलीला सोबत घेऊन गेलो नाही असं त्यांनी सांगितले.
१.४० नंतर सर्वच बदलले
आम्ही रोजप्रमाणे कामात व्यस्त होतो. परंतु १२ जूनला १ वाजून ४० मिनिटांनी सर्वच बदलले. अचानक एक जोरदार स्फोट झाला. आगीच्या विळख्यात सगळीकडे धुराचे लोट पसरले. एअर इंडियाचे विमान मेसच्या इमारतीला धडकले होते. जिथे माझी आई आणि मुलीचा जीव गेला. आम्ही धावत घटनास्थळी पोहचलो परंतु पोलीस आणि इतरांना आम्हाला रोखले. कुटुंबाने आशा सोडली नव्हती. २ दिवस ते सातत्याने घटनास्थळी जात होते. आई आणि मुलगी सुखरूप असावी अशी प्रार्थना ते करत होते. गुरुवारी सकाळी डिएनए रिपोर्टमधून धक्कादायक सत्य कळले, ते दोघेही या जगात नाहीत. आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आयुष्यभर हे दु:ख आम्हाला छळत राहणार असं रवी यांनी म्हटलं. ही दुर्घटना रवी यांच्या कुटुंबावर मोठा आघात आहे.
बोईंग विमानातील बिघाडाबाबत आधीच कळवले होते
दरम्यान, एअर इंडियाच्या दोन वरिष्ठ विमान परिचारिकांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, अहमदाबादअपघाताच्या एक वर्ष आधी बोईंग 787 ड्रीमलाइनरमधील तांत्रिक बिघाडाची माहिती दोघांनीही एअरलाइनला दिली होती. एअरलाइनने केवळ त्यांच्या चिंता फेटाळून लावल्या नाहीत तर त्यांना त्यांचे विधान बदलण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी त्यांचे विधान बदलण्यास नकार दिला तेव्हा एअरलाइनने त्यांना काढून टाकले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी ड्रीमलाइनरच्या दरवाजात बिघाड झाल्याची तक्रार केल्याचा आरोप केला होता.