रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 22:15 IST2025-06-16T22:15:03+5:302025-06-16T22:15:45+5:30

सायंकाळी ६:२० वाजता बिरसा मुंडा विमानतळावर (रांची) उतरणारे हे विमान तांत्रिक कारणामुळे दिल्लीतच सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यामुळे विमानामधील प्रवाशांमध्ये काही काळ भीती पसरली होती.

Air India flight to Ranchi returns to Delhi after takeoff! What exactly happened? | रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?

रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?

दिल्लीहून रांचीकडे जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे (AI 9695) विमान उड्डाण होताच तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा दिल्लीला परतले. सायंकाळी ६:२० वाजता बिरसा मुंडा विमानतळावर (रांची) उतरणारे हे विमान तांत्रिक कारणामुळे दिल्लीतच सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यामुळे विमानामधील प्रवाशांमध्ये काही काळ भीती पसरली होती.

वैमानिकाला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आल्याने त्याने तत्काळ विमान दिल्लीला परत नेण्याचा निर्णय घेतला. दुपारी ४:२५ वाजता दिल्लीहून निघालेले हे विमान रांचीला ६:२० वाजता पोहोचणार होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे ते नियोजित स्थळी पोहोचू शकले नाही. तपासणी आणि तांत्रिक दुरुस्तीनंतरच विमानाने आपला पुढील प्रवास सुरू केला.

अहमदाबाद विमान अपघात आणि उच्चस्तरीय समितीची बैठक
एकीकडे एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची ही घटना समोर आली असतानाच, दुसरीकडे अहमदाबादमधील अलीकडील विमान अपघातावरून सध्या देशात वातावरण तापले आहे. या अपघाताची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय बहु-विद्याशाखीय समिती स्थापन केली आहे. या समितीने सोमवारी अहमदाबादमधील विमान अपघातासाठी जबाबदार असलेल्या विविध संभाव्य कारणांवर सविस्तर चर्चा केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने अपघाताच्या संभाव्य कारणांबाबत विविध भागधारकांचे म्हणणे ऐकून घेतले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावरही बैठकीत सखोल चर्चा झाली.

दिल्लीत झालेल्या समितीच्या या पहिल्या बैठकीचा मुख्य उद्देश विमान अपघाताच्या संभाव्य कारणांचे विश्लेषण करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मानक कार्यपद्धती अर्थात एसओपी तयार करणे हा होता. या बैठकीला नागरी विमान वाहतूक मंत्रालय, गृह मंत्रालय, भारतीय हवाई दल, गुप्तचर विभाग, गुजरात सरकार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो या महत्त्वाच्या विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Air India flight to Ranchi returns to Delhi after takeoff! What exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.