Air India Flight: दिल्ली बॉम्बब्लास्टनंतर दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहेत. अशातच, मुंबईहूनवाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बने उटवण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या घटनेनंतर लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, वाराणसीला जाणाऱ्या विमानाला धमकी मिळाल्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढून बॉम्ब शोधक पथकाने विमानाची कसून तपासणी केली. सध्या हे विमान आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आले आहे. संबंधित अधिकारी या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
दरम्यान, बुधवारी इंडिगो एअरलाइन्सलाही बॉम्बच्या धमकीचा ईमेल मिळाला, ज्यामुळे अनेक विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबई, चेन्नई, तिरुवनंतपुरम, दिल्ली आणि हैदराबाद या पाच प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवर दुपारी 3:30 वाजता हा ईमेल मिळाला, ज्यामध्ये बॉम्बच्या धमकीचा उल्लेख होता. खबरदारी म्हणून, या विमानतळांवर आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्यात आले.