Ahmedabad Plane Crash : विमान अपघातातील 'त्या' १९ लोकांवर गुजरात सरकारने केले अंत्यसंस्कार; पण कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:22 IST2025-07-09T12:21:35+5:302025-07-09T12:22:24+5:30
अपघातानंतर अहमदाबाद प्रशासनाने घटनास्थळाचे सखोल सर्वेक्षण केले. या दरम्यान, मृतांच्या शरीराचे अनेक भाग नंतरही सापडले.

Ahmedabad Plane Crash : विमान अपघातातील 'त्या' १९ लोकांवर गुजरात सरकारने केले अंत्यसंस्कार; पण कारण काय?
गेल्या महिन्यात १२ जून रोजी झालेल्या एका भयानक विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या भीषण दुर्घटनेत २७०हून अधिक प्रवाशांचा करुण अंत झाला. अपघातानंतर अनेकांना आपल्या आप्तांच्या मृतदेहांची प्रतीक्षा होती आणि डीएनए चाचणीनंतर अनेक तासांनी कुटुंबाकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आले. पण, काही मृतदेहांचे अवशेष घटनास्थळीच राहिले होते. या उरलेल्या अवशेषांवर गुजरात सरकारने आता अंतिम संस्कार केले आहेत.
अवशेष सापडले, डीएनएने ओळख पटवली
अपघातानंतर अहमदाबाद प्रशासनाने घटनास्थळाचे सखोल सर्वेक्षण केले. या दरम्यान, मृतांच्या शरीराचे अनेक भाग नंतरही सापडले. या अवशेषांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली. ओळख पटल्यानंतर गुजरात सरकारने मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबीयांनी अत्यंत जड अंतःकरणाने या अवशेषांवर अंतिम संस्कार करण्याची परवानगी सरकारला दिली.
त्यानंतर, रुग्णालय अधीक्षक, न्यायवैद्यक औषध विभागाचे प्रमुख (HOD), वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर आणि अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या अवशेषांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
२६ पैकी १९ अवशेषांवर सरकारने केले अंत्यसंस्कार
या प्रकरणाची माहिती देताना गुजरात आरोग्य विभागाने सांगितले की, डीएनए नमुने घेतल्यानंतरच कुटुंबीयांना कळवण्यात आले होते की, भविष्यात त्यांच्या प्रियजनांच्या मृतदेहांचे काही आणखी भाग सापडू शकतात. यानंतर, तपासणीत २६ मृतदेहांचे अवशेष पुन्हा मिळाले. याची माहिती तात्काळ कुटुंबीयांना देण्यात आली.
प्रशासनाकडून माहिती मिळाल्यानंतर, या २६ पैकी ७ मृतांचे कुटुंबीय आले आणि त्यांनी आपल्या प्रियजनांचे अवशेष ताब्यात घेतले. उरलेल्या १९ मृतांच्या कुटुंबीयांनी अवशेषांवर सरकारनेच अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली, त्यानंतर प्रशासनाने अत्यंत सन्मानाने त्यांचे अंत्यविधी पार पाडले.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या १९ अवशेषांपैकी १८ अवशेषांवर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले, तर एका अवशेषाला दफनविधी करण्यात आले. प्रशासनाने स्पष्ट केले की, एक अवशेष इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीचा होता, त्यामुळे इस्लामिक रितीरिवाजानुसार त्याच्यावर दफनविधी करण्यात आला.