अहमदाबाद विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातामध्ये आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक जखमींवर उपचार सुरु आहेत. भाजपा आणि काँग्रेसने सर्व कार्यक्रम, सभा रद्द केल्या आहेत. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह नागरी उड्डाण मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
यावेळी स्वामी यांनी लाल बहादूर शास्त्रींचा हवाला दिला आहे. मोदी आणि त्यांचे सहकारी आतापर्यंत जे काही करत आहेत ते सर्व भ्रामक आहे जे थांबले पाहिजे, असे स्वामी म्हणाले आहेत.
१९५० च्या दशकात जेव्हा एक ट्रेन रुळावरून घसरली तेव्हा लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्याच नैतिकतेनुसार मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण नायडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतो. जेणेकरून या विमान अपघाताची मुक्त आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. मोदी आणि त्यांचे सहकारी आतापर्यंत जे काही करत आहेत ते सर्व भ्रामक आहे जे थांबले पाहिजे, असे स्वामी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.
एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह, मंत्री नायडू हे अहमदाबादला पोहोचले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहमदाबादला निघाल्याचे समजते आहे. या अपघात ग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. तसेच हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळल्याने अनेक इंटर्न डॉक्टरांनाही प्राण गमवावे लागल्याचे सांगितले जात आहे.