भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नवा रेल्वेमार्ग; 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 01:00 PM2018-05-17T13:00:18+5:302018-05-17T13:00:18+5:30

बांगलादेशातील चितगाँव जिल्ह्यातील अखुरा गाव आणि भारतातील त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा यांच्यामध्ये 45 किमीचे अंतर आहे.

Agartala and Bangladesh’s Akhaura: Texmaco bags Rs 200 crore contract | भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नवा रेल्वेमार्ग; 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण होणार

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नवा रेल्वेमार्ग; 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण होणार

नवी दिल्ली- त्रिपुराची राजधानी आगरतळा आणि बांगलादेशातील अखुरा हे गाव आता रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे. टेक्समाको रेल या कंपनीला 200 कोटी रुपयांचे हे कंत्राट मिळाले आहे.  बांगलादेशातील चितगाँव जिल्ह्यातील अखुरा गाव आणि भारतातील त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा यांच्यामध्ये 45 किमीचे अंतर आहे. या मार्गासाठी 200 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पाची पूर्तता करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ त्रिपुरा आणि बांगलादेश यांच्यासाठी सेवा सुरु होणार नसून कोलकाता आणि आगरतळा यांच्यामधील प्रवासाचे अंतरही कमी होणार आहे. त्याचप्रमाणे भारताचा चितगाँव बंदरापर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामधील द्वीपक्षीय संबंध आणि व्यापार सुधारण्यासाठी या मार्गाचा विशेष फायदा दोन्ही देशांना होणार आहे.
याबरोबरच भारतीय रेल्वेने येत्या दोन वर्षांमध्ये ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये रेल्वेची सुविधा देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सुमारे 90 हजार कोटी रुपये खर्च करुन ईशान्य भारतातील रेल्वेसेवेचे जाळे अधिक दृढ चांगले बनवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेशातील 795 किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचाही समावेश आहे. यामुळे चीनच्या सीमेपर्यंत भारतीय नागरिकांना आणि लष्कराला वाहतूक करणे सोपे जाणार आहे. त्याबरोबरच बोगीबील हा अरुणाचल प्रदेश व आसाम यांना जोडणारा ब्रह्मपुत्रेवरील पूल लवकरच खुला होणार आहे. या पुलामुळेही रेल्वेला अरुणाचल प्रदेशात सेवा देणे सोपे जाणार आहे. 

आसाम , अरुणाच प्रदेश आणि त्रिपुरा सध्या रेल्वेने जोडली गेले आहेत. मात्र मिझोरम, मेघालय, मणिपूर, सिक्किम, नागालँड या राज्यांच्या राजधान्या रेल्वेने जोडल्या गेल्या नाहीत. भैराबी आणि सायरंग या 51.38 किमी लांबीच्या मार्गाने मिझोरमची राजधानी ऐजॉल जोडण्यात येणार आहे. सायरंग हे ऐजॉलपासून 18 किमी अंतरावर आहे. त्याचबरोबर सिक्किमची राजधानी गंगटोकला जाण्यासाठी रांगपो या गावापर्यंत रेल्वे नेण्यात येणार आहे. रांगपोपासून गंगटोक 40 किमी अंतरावर आहे.

ब्यारनिहाट ते शिलाँग या मेघालयातील रेल्वेमार्गाचे काम खासी विद्यार्थी संघटनेच्या विरोधामुळे बंद पडले आहे. या प्रदेशात जमिन अधिग्रहणासाठी रेल्वेला अद्याप ना हरकत प्रमामपत्र मिळालेले नाही. खासी हिल्स अटोनोमस डिस्ट्रीक्ट कौन्सीलने अद्याप ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही.

सिवोक ते रांगपो या ४४ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या सिक्किममध्ये सुरु आहे. तो पूर्ण होण्याआधीच पाक्योंग  येथे विमानतळ बांधण्यात आला आहे. त्यामुळे सिक्किमवासियांना विमानसेवा आणि रेल्वेसेवा एकापाठोपाठ एक मिळत आहेत. सिक्किम हे एकमेव राज्य होते की ज्यामध्ये आजवर विमानतळ नव्हता. पाक्योंग विमानतळ हा भारत चीन सीमेजवळ असल्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उडान योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले पाक्योंग हे विमानतळ भारतातील 100 वे विमानतळ ठरले आहे.  

Web Title: Agartala and Bangladesh’s Akhaura: Texmaco bags Rs 200 crore contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.